भारत सर्वात आधी या देशांना देणार कोरोना प्रतिबंधक लस


नवी दिल्ली – केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपातकालीन वापरास परवानगी दिल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. भारताकडे या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसीची मागणी जगातील अनेक देशांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारताने ब्राझिलला अ‍ॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तात्काळ पुरवठा करावा अशी मागणी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी केली आहे. पण कोरोनासंदर्भातील जे धोरण भारताने तयार केले आहे त्यानुसार भारत सर्वात आधी आपल्या शेजारील देशांना कोरोना प्रतिबंधक लस देणार आहे. त्यानंतर जगभरातील इतर देशांमध्ये कोरोना लस पाठवली जाणार आहे.

कोरोनाबाधिकांच्या संख्येत दिवसोंदिवस वाढत असल्यामुळे यासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपातकालीन वापरासाठी भारताने परवानगी दिल्यानंतर भारताकडे ब्राझील, मोरक्को, सौदी अरेबिया, म्यानमार, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका सारख्या देशांनी कोरोना प्रतिबंधक लसीची मागणी केली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतर देशांना कोरोना लसीचा पुरवठा करताना भारत शेजारी देशांना प्रथम प्राधान्य देणार असल्यामुळेच बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि अफगाणिस्तानसारख्या देशांना भारत आधी लसींचा पुरवठा करणार असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

भारत सुरुवातीपासूनच कोरोनाविरोधातील लढाईत जगभरातील देशांसोबत खांद्याला खांदा लावून लढत आहे. या लढाईमध्ये सर्व देशांशी सहकार्य करणे हे आपले कर्तव्य असल्याची भारताची भूमिका आहे. या कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये भारताला जास्तीत जास्त देशांची मदत करता यावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. भारत सरकारने सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझेन्का कोविड-१९ लस आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ला आपातकालीन वापरास मंजुरी दिली आहे.

भारतीय लसींचा दर्जा, गुणवत्ता आणि परिणामकारकता पाहता जगभरातून या लसींना मागणी वाढल्याचे चित्र दिसत असल्यामुळेच जगभरात या पूर्णपणे मेड इन इंडिया लसींचे वितरण करण्यासाठी भारत सज्ज झाला असून या लसींच्या निर्यातीच्या संदर्भातील निर्णय भारतातील लसीकरणाच्या पहिल्या काही टप्प्यांनंतर घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळेच कोरोना लसीकरणामध्ये भारत हा जागतिक केंद्र होण्याची शक्यता आहे.

चीननेही भारतीय बनावटीच्या कोरोना लसींचे कौतुक केले आहे. दक्षि्ण आशियातील आमच्या शेजाराच्या देशानी तयार केलेली कोरोना लस ही गुणवत्तेच्या बाबतीत कोणत्याही लसीपेक्षा कमी नसल्याचे चीनने म्हटले आहे. भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या कोरोनाच्या लसी या चीनच्या करोना लसी इतक्याच प्रभावी असल्याचे चीनमधील कम्युनिस्ट पार्टीच्या ग्लोबल टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या लेखामध्ये म्हटले आहे. भारताच्या कोरोना लसी या संशोधन आणि निर्मितीच्या क्षेत्रामध्ये उत्तम असल्याचेही या लेखात म्हटले आहे.