‘ईडी’च्या आडून भाजपचे सूडाचे राजकारण ही गंभीर बाब – गृहमंत्री अनिल देशमुख


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना नोटीस बजावल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी मोदी सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांविरोधात टीकेचा सूर लावला. सीबीआयला कोणत्याही प्रकरणाचा तपास महाराष्ट्रात करायचा असेल, तर राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. राज्यात सीबीआयला येण्यापासून रोखण्यात आल्याने आता ‘ईडी’ला हाताशी घेऊन केंद्र सरकार आणि भाजपचे नेतेमंडळी सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. त्यांनी मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाजवळ पत्रकारांशी संवाद साधला.

भाजप ‘ईडी’च्या आडून सूडाचे राजकारण करत असून ही गंभीर बाब आहे. भाजप नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ‘ईडी’ची नोटीस पाठवण्यात येते. हेच काम सुरुवातीला सीबीआय करत होते. पण, राज्यात चौकशी करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने सीबीआयबाबत आता केंद्र सरकार काहीच करु शकत नाही. अशा परिस्थितीत राजकीय सूडाच्या भावनेने ‘ईडी’च्या मदतीने कारवाई केली जात आहे. ज्या पध्दतीने ‘ईडी’चा राजकारणासाठी वापर होत आहे, ते पाहून अशा प्रकारचे राजकारण देशात कधीही पाहण्यात आले नसल्याचे देशमुख म्हणाले.