फडणवीस सरकारच्या काळात तयार करण्यात आलेल्या समित्या आणि अभ्यास गट बरखास्त


पुणे : अभ्यासक्रम निर्मितीसाठी नेमलेल्या विषय समित्या आणि अभ्यास गट महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम निर्मिती मंडळाने (बालभारती) बरखास्त केले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात या समित्या आणि अभ्यास गट तयार करण्यात आले होते. दरम्यान विद्यमान सरकारशी संबंधित सदस्यांचा त्याजागी नव्याने नेमल्या जाणाऱ्या अभ्यास मंडळांमध्ये समावेश केला जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, संचालक दिनकर पाटील यांनी संबंधित सदस्यांना विषय समित्या आणि अभ्यास गट बरखास्त करण्यात आल्याचे पत्र पाठवले आहे.

नवा अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी विषय समित्या आणि अभ्यास गटांची पुनर्रचना राज्यातील फडणवीस सरकारच्या काळात विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना करण्यात आली होती. बालभारतीच्या प्रचलित पद्धतीत बदल करून अभ्यास मंडळ हे नाव बदलून विषय समिती आणि अभ्यास गट असे करण्यात आले. भाजपसंबंधित सदस्यांची त्यावेळी नेमणुकांमध्ये वर्णी लावण्यात आल्याची चर्चा होता. तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये झालेले उद्बोधन वर्ग, पुनर्रचित अभ्यासक्रम यावरून वादही निर्माण झाले होते.

विद्यमान सरकारशी संबंधित नव्या सदस्यांच्या नेमणुका पुढील काही काळात अभ्यास मंडळांमध्ये केल्या जातील. त्यात सत्तेतील तीन पक्षांशी संबंधित व्यक्तींची नव्या विषय समित्या आणि अभ्यास गटांमध्ये नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहेत.