शोएब अख्तर बरळला; आधी काश्मीर ताब्यात घेऊ, मग भारतावर हल्ला करू


इस्लामाबाद : ‘गजवा-ए-हिंद’ची स्वप्ने पाहत असलेल्या पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने आधी आम्ही काश्मीर ताब्यात घेऊ आणि मग भारतावर हल्ला करू, असे वक्तव्य समा टीव्हीशी बोलताना केले आहे. सोशल मीडियावर अख्तरचे हे वक्तव्य व्हायरल झाले असून भारताविरोधात गरळ ओकणारा अख्तर हा पहिला क्रिकेटपटू नाही. याआधी शाहिद आफ्रिदी, जावेद मियांदाद यांच्यासारख्या क्रिकेटपटूंनीदेखील भारताविरोधात वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.

शोएब समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ‘गजवा-ए-हिंद’बद्दल बोलताना दिसत आहे. ‘गजवा-ए-हिंद’चा अर्थ ‘भारताविरोधात पवित्र युद्ध’ असा होतो. ‘गजवा-ए-हिंद’चा आमच्या पवित्र पुस्तकात उल्लेख आहे. रक्ताने नदी दोनदा लाल होईल. अफगाणिस्तानहून सेना अटॉकपर्यंत पोहोचेल. उझबेकिस्तानहून विविध तुकड्या पोहोचतील. हा सगळा भाग ऐतिहासिक क्षेत्र खोरासनशी संबंधित असून तो लाहोरपर्यंत पसरला असल्याचे अख्तरने मुलाखतीत म्हटले आहे.


समा टीव्हीच्या वृत्तनिवेदिकेने अख्तरला याबद्दल लोकांनी वाचन करावे, असे तुम्हाला वाटते का?, असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना त्याने हो, त्यानंतर तिथून शमल मशरिक निघेल. त्यानंतर आपण काश्मीर फत्ते करून पुढे मार्गक्रमण करू, असे म्हटले आहे. सोशल मीडियावर शोएबचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून शोएबवर अनेकांनी टीका केली आहे. अरब द्वीपकल्पाच्या उत्तरेला असलेल्या एका क्षेत्रासाठी शमल मशरिक शब्द वापरला जातो. पाकिस्तानमधील कट्टरपंथीय इस्लामिक प्रचारकांकडून ‘गजवा-ए-हिंद’ शब्दाचा वापर केला जातो. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाशी संबंधित हा शब्द आहे.