सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली तरी एल्गार परिषद घेणारच; कोळसे-पाटील


पुणे: एल्गार परिषदेचे आयोजन करण्याच्या हालचाली पुण्यात पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने आम्हाला परिषदेची परवानगी द्यावी. सरकारने परवानगी न दिल्यास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही जाऊ. त्याचबरोबर परिषदेला सर्वोच्च न्यायालयानेही परवानगी नाकारली, तरी आम्ही परिषद घेणारच असे सांगतानाच आम्ही तुरुंग, मरण वगैरे गोष्टींना घाबरत नसल्याचा इशारा एल्गार परिषदेचे आयोजक आणि माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी दिला आहे.

यासंदर्भातील वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले आहे. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार 31 डिसेंबर 2017 पासून दरवर्षी एल्गार परिषद होते. एकूण 250 ते 300 संघटना या परिषदेत आहेत. एल्गार परिषद ही सांस्कृतिक संघटना आहे. आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो. समाज प्रबोधन त्यातून करण्याचा आमचा हेतू असतो. मूळ प्रश्नांवर राजकारण करायला आम्ही तरुणांना सांगतो. पोटापाण्याच्या प्रश्नावर राजकारण करायला सांगतो, असे कोळसे-पाटील म्हणाले. जात, धर्म वगैरे सोडून आम्ही प्रबोधन करत असतो. नक्षल्यांशी आमचा काहीही संबंध नाही. नक्षली संबंधाचे आमच्यावर होणारे आरोप खोटे आहेत. आम्ही ब्राह्मणवादावर घाला घालतो. त्यामुळेच आम्हाला बदनाम केले जात असल्याचे सांगतानाच दडपण आणून आम्हाला गुन्हेगार ठरवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मी या एल्गार परिषदेचा आयोजक आहे. सरकारने आम्हाला परवानगी दिली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ. सर्वोच्च न्यायालयानेही परवानगी नाकारली तरीही आम्ही परिषद घेणारच. जेल, न्यायालय आणि मरणाला आम्ही घाबरत नाही. आम्ही आमचे काम करतच राहणार, असेही त्यांनी म्हटले आहे.

शहरी नक्षलवादाशी जोडली गेलेली एल्गार परिषद, त्यानंतर बुद्धिजीवींना झालेली अटक यावरुन मोठा गाजावाजा झाला. डाव्या आणि उजव्या विचारांचा हा संघर्ष एवढ्या टोकाला पोहोचला की या प्रकरणात आत्तापर्यंत देशातील विविध न्यायालयात 118 याचिका दाखल आहेत. तरीही यंदा एल्गारची सांस्कृतिक परिषद होणार असल्याचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी सांगितले आहे.

2017च्या डिसेंबरमध्ये पुण्यातील शनिवार वाड्यावर एल्गार परिषद पार पडल्यानंतर कोरेगाव-भीमात मोठी दंगल उसळली होती. एल्गार परिषदेशी या दंगलीचा थेट संबंध जोडण्यात आला अन् एल्गार परिषदेवर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर एनआयएने हा तपास ताब्यात घेत देशभरात डाव्या विचारांच्या अनेक बुद्धिजीवींना अटक केली. देशभरात यावरुन डाव्या विचारांच्या लोकांनी मोठे काहूर माजवले. पण सरकार ठाम राहील अन न्यायालयानेही पोलिसांचा तपास बरोबर असल्याचे सांगितले. या सगळ्या परिस्थितीत एवढा वादंग सुरु असताना पोलिसांनी परवानगी देवो, अथवा न देवो यंदाही एल्गारची सांस्कृतिक परिषद होणारच असे, कोळसे पाटील यांनी सांगितले आहे. एल्गार परिषदेला जाणीवपूर्वक बदनाम केल्याचेही कोळसे पाटील यांचे म्हणणे असल्यामुळे दरवर्षी आम्ही एल्गार परिषद घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडात 31 डिसेंबरला दिवसभराची ही परिषद होणार आहे. याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह काही कलाकृतींचे प्रदर्शन लावले जाईल. या परिषदेला जेष्ठ विचारवंत अरुंधती रॉय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यात कोरेगाव भीमा शौर्य दिन अभियान समितीसह 200 ते 300 समविचारी संघटना सहभागी होतील. पण या परिषदेला ब्राह्मण महासंघाने विरोध दर्शविला आहे. या परिषदेला विचार करूनच परवानगी देण्यात यावी, असे ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी सांगितले.