नाताळच्या पार्श्ववभूमीवर राज्य सरकारची नियमावली जाहीर


मुंबई – 2020 या वर्षातील जवळपास सर्वच सण कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने साजरा करण्यात आले. आता अवघ्या दोन दिवसांवर येऊ घातलेल्या नाताळ या सणाच्या निमित्तानेही राज्य सरकारने जनतेला आवाहन केले आहे.

मंगळवारी सर्व ख्रिस्त धर्मीयांना यंदाचा नाताळ सण हा अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आवाहन केले आहे. महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती मिळताच आतापासूनच सावधगिरीची पावले उचलली जात आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यूचे हे नियम लागू असतील. शिवाय नाताळ सण साजरा करण्यासाठीही ठराविक नियमांचे सर्वांना पालन करावे लागणार आहे.

नाताळ साजरा करण्यासाठी राज्य सरकारची नियमावली खालीलप्रमाणे

  • 50हून जास्त जणांचा समावेश स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मासमध्ये नसावा.
  • चर्चमध्ये कोणत्याही वेळेत गर्दी होणार नाही याची काळजी संबंधितांनी घ्यावी.
  • फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासोबतच चर्च परिसराचे नियमितपणे सॅनिटायझेशन करणे बंधनकारक
  • मास्कचा वापर चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी बंधनकारक.
  • 10हून जास्त व्यक्तींचा चर्चमध्ये प्रभू येशुचे स्तुतीगीत गाण्यासाठी सहभाग नसावा.
  • स्तुतीगीत गातेवेळी वापरण्यात येणारे माइक स्वच्छ असण्याबाबत काळजी घ्यावी.
  • 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षांखाली लहान मुलांनी चर्चमध्ये आणि घराबाहेर जाणे टाळावे. याऐवजी यंदा त्यांनी हा सण घरातच साजरा करावा.
  • कोणत्याही प्रकारे गर्दीला आकर्षित करणारे देखावे, आतिषबाजीचे आयोजन करु नये.
  • 31 डिसेंबरला आभारप्रदर्शनासाठीचे मास आयोजित करतेवेळी वेळेचे निर्बंध पाळत मध्यरात्रीऐवजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास याचे आयोजन करावे.

    नाताळ सणासाठी आखून दिलेल्या या नियमावलीचे पालन करत नागरिकांनी प्रशासनाला मदत करत कोरोना नियंत्रणात ठेवण्याच्या या युद्धात हातभार लावावा, असे जाहीर आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.