…मग काय महाराष्ट्रात पाकिस्तानचे झेंडे लावायचे? निलेश राणेंचा राज्य सरकारला सवाल


मुंबई – मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असून मराठा आरक्षणाची यापूर्वी घटनापीठापुढे सुनावणी करण्यात आली होती. पण मराठा आरक्षणावरील स्थगिती यानंतरही कायम ठेवण्यात आली. दरम्यान, यानंतर सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला.

त्यातच सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणाबाबत अंतिम निर्णय देईपर्यंत मराठा समाजाच्या इच्छुक विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्टय़ा दुर्बल प्रवर्गासाठींच्या कोटय़ातून (ईएसडब्ल्यू) शैक्षणिक लाभ घेण्यास परवानगी द्यावी, याबाबत जनहित याचिका करण्यात आलेली असून उच्च न्यायालयाने त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास काल नकार दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाकडून मराठा आरक्षणाबाबत अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची शक्यता लक्षात घेता मुंबईत प्रवेश करणाऱ्या मार्गांवर पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. मुंबईच्या दिशेने ठाण्यातून जात असलेल्या एका एसटी बसवरील भगवा झेंडा पोलिसांनी हटवण्यास सांगितल्याचा प्रकार सोमवारी समोर आल्यानंतर आता विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे.


दरम्यान या घटनेनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आयुष्य पणाला लावले. त्या महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांचा जेंडा काढण्याची वेळ या ठाकरे सरकारने आणली. महाराष्ट्रात ‘जय जिजाऊ जय शिवराय’चे झेंडे लावायचे नाही तर काय पाकिस्तानचे लावायचे?,” असा सवाल विचारत त्यांनी आपला संताप ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला. पोलिसांनी ठाण्यातील आनंदनगर येथून मुंबईच्या दिशेने दात असलेल्या एसटी महामंडळाच्या बसवरील भगवा झेंडा हटवण्यास सांगितल्यानंतर हा झेंडा एसटी चालकाने काढल्याचा प्रकार घडला होता.