बसवरचा भगवा का काढला याचे उत्तर उद्धवजी आणि पवार साहेब दोघांनाही द्यावे लागेल


मुंबई – मराठा संघटनांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांकडून सोमवारी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच रोखण्यात आले. पोलिसांनी सकाळपासूनच मुलुंड आणि मानखुर्द येथे मोठा फौजफाटा तैनात केला होता. दरम्यान एका बसवरील भगवा झेंडा यावेळी काढण्यात आल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

यासंदर्भात ट्विट करत चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, भगवा काढून बस रवाना केली…धक्कादायक! हे कोणत्या प्रकारचं राजकारण करत आहे सरकार…उद्धवजी आणि पवार साहेब दोघांनाही याचं उत्तर द्यावं लागेल! काँग्रेस तर पूर्वीपासून हेच करते मात्र या लोकांकडून अशी अपेक्षा नव्हती.

मराठा संघटना मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. काही संघटनांनी यासाठी शहरात जोरदार आंदोलन करण्याचे ठरवले होते. या संघटनांकडून मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करून सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरु असल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्य़ांमधून मोठय़ा प्रमाणात मराठा समाजाचे कार्यकर्ते शहरात येण्याची शक्यता होती. यामुळे ठाणे, मुलुंड आणि मानखुर्द टोलनाका परिसरात सोमवारी सकाळपासून पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांना थांबवून या वाहनांची पोलीस तपासणी करत होते. या नाकाबंदीमुळे वाहतूक कोंडी झाल्याने सामान्य प्रवाशांना याचा त्रास सोसावा लागला.