मंत्रालयातील ड्रेसकोडवरून रामदास आठवलेंचा सरकारला चिमटा


मुंबई – मंत्रालयात येण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन ड्रेस कोड लागू करण्यात आला असून सरकारने मंत्रालयात येताना कोणते कपडे घालावे याबाबत निर्देश जारी केले आहेत. मंत्रालयाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार जीन्स, टी शर्ट सरकारी कर्मचाऱ्यांना घालता येणार नाही, तसेच स्लीपर्सही न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, पण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी या ड्रेसकोडवरून सरकारला चिमटा काढला आहे.


रामदास आठवलेंनी याबाबत ट्विट करून म्हटले आहे की, राज्य सरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबेरंगी नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई केली आहे. ही मनाई मंत्र्यांनाही लागू झाल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल? अशी मिश्किल टीका आठवलेंनी केली आहे.

सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कर्मचाऱ्यांकडून चांगल्या वागणुकीची तसेच व्यक्तिमत्वाची अपेक्षा असते. जर अधिकारी, कर्मचारी यांची वेशभूषा या परिस्थितीत अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कामकाजावर देखील होतो. या सर्व गोष्टींचा विचार करता मंत्रालय तसेच सर्व राज्य शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीने असावा, या विषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.