शरद पवारांनी अखेर ‘त्या’ पत्रावर सोडले मौन


नवी दिल्ली – आघाडी सरकारच्या काळात शरद पवार यांनी केंद्रीय कृषिमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना कृषि कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत त्यावेळी अनेक राज्यांना पत्र लिहिले होते. हे पत्र सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा व्हायरल झाले असून शरद पवारांवर भाजप पाठिंबा देण्यावरुन निशाणा साधत आहे. सोमवारी पत्राचा उल्लेख करत शरद पवारांवर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील टीका केली होती. दरम्यान शरद पवारांनी आज दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना यावर भाष्य करत मौन सोडले आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी शरद पवार दिल्लीत पोहोचले होते. यावेळी पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात चर्चा झाली. त्यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पत्राबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले की, पत्राचा हवाला ज्यांनी दिला आहे त्यांनी ते थोडे नीट वाचले असते तर त्यांचा वेळ वाया गेला नसता. कायद्यातील सुधारणांसंदर्भात मी पत्र लिहिले होते यात कोणतेही दुमत नाही. पण जी तीन नवीन कृषि विधेयक आज आणली आहेत, त्यात याचा उल्लेख दिसत नाही.

यावेळी विषय भरकटवण्यासाठी हे केले जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. याला जास्त महत्व देऊ नका असेही त्यांनी म्हटले आहे. आपण शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे शरद पवारांनी सांगत अधिक बोलण टाळले. पण वारंवार पत्र आणि शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न पत्रकारांनी विचारल्याने शरद पवार संतापले आणि पत्रकार परिषद संपवून निघून गेले.