रक्ताचा तुटवडा ! आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे रक्तदान करण्याचे आवाहन


जालना : आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध असल्याची माहिती जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्याचबरोबर तसेच मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहनही टोपेंनी यावेळी केले आहे.

टोपे म्हणाले, मोठ्या प्रमाणात तरूण वर्ग हा रक्तदान करत असतो. पण अनेक महाविद्यालये आणि एनजीओ लॉकडाऊनच्या काळात बंद असल्यामुळे रक्तसाठ्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. सध्या आता पाच ते सहा दिवसच पुरेल एवढाच रक्तसाठा राज्यात उपलब्ध आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा येत्या 12 डिसेंबरला वाढदिवस आहे. त्यानिमित्त तरूण वर्गाने रक्तदान करण्याचे आवाहन टोपे यांनी यावेळी केले आहे. तसेच राज्यातील रुग्णालयांमध्ये कोरोना काळात रक्ताची टंचाई भासत असून स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन राज्यातील जनतेने रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील केले आहे.

या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा येत्या काळात भासू नये यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले.