मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर


मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षण प्रकरणातील अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीबाबत 5 सदस्यीय घटनापीठासमोर 9 डिसेंबरला दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. राज्य सरकारकडून या सुनावणीसाठी पाच वकिलांची फौज तयार करण्यात आली असून आहे. पाच वकिलांची समन्वय समिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विटरवर जाहीर केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा मराठी आरक्षण प्रकरणातील अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात 5 सदस्यीय घटनापीठासमोर होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने पाच वकिलांची समन्वय समिती जाहीर करण्यात येत असून अ‍ॅड. आशिष गायकवाड, अ‍ॅड. राजेश टेकाळे, अ‍ॅड. रमेश दुबे पाटील, अ‍ॅड. अनिल गोळेगावकर आणि अ‍ॅड. अभिजीत पाटील यांचा या समन्वय समितीमध्ये समावेश असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक आणि संघटनांना येत्या 9 डिसेंबरला होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे. त्याचबरोबर आलेल्या सूचनांचा अभ्यास करून पाच वकिलांची समिती राज्य सरकारच्या वकिलांना माहिती देईल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.