जनतेने बहुमत दिलेले नसतानाही ते सत्तेत; ठाकरे सरकारवर पंकजा मुंडेंची टीका


मुंबई – जनतेने बहुमत दिलेले नसतानाही ते सत्तेत असल्यामुळे त्यांचे सध्या सत्ता टिकवणे हेच असल्याचे मला वाटते, असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. जे आरक्षणाबाबत झाले ते अत्यंत निराशाजनक असल्याचेबी त्या म्हणाल्या आहेत. तसेच सरकारने धनगर आरक्षण विषय हाताळण्यात गती घेतली नसल्याची टीकाही त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांचे अभिनंदन करते. एक वर्ष पूर्ण होते की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रम होता. ते जनतेने बहुमत दिलेले नसतानाही सत्तेत असल्यामुळे त्यांचे सध्या सत्ता टिकवणे हे ध्येय असल्याचे मला वाटते. जनतेचे हित दुय्यम अशी परिस्थिती असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. सरकारसमोर कोरोनाचा सामना करणे आव्हान आहे. हे नक्कीच सरकारसाठी त्रासदायक आहे. आम्ही जनहितासठी सहकार्याची भूमिका नक्की ठेवू, असे आश्वासन यावेळी पंकजा मुंडे यांनी दिले.

त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही सर्वांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आहे. मराठा आरक्षणाबाबत सध्या जे झाले, ते अत्यंत निराशाजनक आहे. याबाबत मराठा तरुणांमध्ये, समाजात तीव्र संताप आणि खेद आहे. यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, त्याचबरोबर राज्य सरकारने केंद्राकडे त्यासंबंधी प्रस्ताव पाठवला पाहिजे. तसेच धनगर समाज सात दशकांपासून आरक्षणाची वाट पाहत आहे. आरक्षणासाठी त्यांना ७० वर्ष वाट पाहावी लागत आहे, हे दुर्देवी आहे. सरकारने हा विषय हाताळण्यात गती घेतली नाही. त्यांनी या विषयाला हातच लावला नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे.