महाराष्ट्रात दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR टेस्ट बंधनकारक


मुंबई : कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नवे निर्देश मिशन बिगीन अगेन अंतर्गत जाहीर करण्यात आले आहेत. त्यातच आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट बंधनकारक करण्यात आले आहे. किमान 4 दिवस आधी ही टेस्ट केलेली असावी, असेही त्यात नमुद करण्यात आले आहे.

राज्य सरकार कोरोनाचा अटकाव करण्यासाठी हळूहळू कठोर निर्णय घेणार आहे. त्यानुसार आता दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट बंधनकारक करण्यात आले आहे. 4 दिवसांपूर्वीचा टेस्ट रिपोर्ट सादर करणे आवश्यक झाले आहे.

महाराष्ट्र सरकारने देशांतर्गत विमान, रेल्वे आणि रस्ते प्रवास करुन राज्यात प्रवेश करण्यासाठी एसओपी जारी केली आहे.

  • विशेषत: दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांतून प्रवास करुन येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रात सशर्त प्रवेश देण्यात येणार आहे.
  • RTPCR टेस्ट दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना बंधनकारक करण्यात आली आहे.
  • दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या चार राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR टेस्टचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल. 72 तासांपेक्षा जूना हा रिपोर्ट नसावा. तसा रिपोर्ट नसेल तर विमानतळावरच टेस्ट करावी लागणार आहे.
  • त्याचा रिपोर्ट चार-पाच तासांत येईल, तोपर्यंत त्यांना क्वॉरंटाईन व्हावे लागेल. पण प्रवाशांकडे स्वत: टेस्ट केलेला रिपोर्ट नसेल तर विमानतळावरुन बाहेर पडता येणार.
  • प्रवाशांना टेस्ट केल्यानंतरच घरी जाण्याची परवानगी असेल. प्रवाशांना आपला फोन क्रमांक, जिथे जाणार आहोत त्या घराचा पत्ता द्यावा लागेल.
  • रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास ट्रेसिंग करण्यासाठी म्हणून हा तपशील प्रवाशांकडून टेस्टिंगवेळी घेण्यात येईल.
  • ज्या प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील, त्यांच्याशी संपर्क साधण्यात येईल आणि प्रोटोकॉलप्रमाणे पुढची कार्यवाही केली जाईल.
  • ज्या भागात विमानतळ आहे, त्या क्षेत्रातील पालिका आयुक्त नोडल ऑफिसर म्हणून काम पाहतील. वर उल्लेख करण्यात आलेले नियम पाळले जात आहेत का? हे पाहणं त्यांची जबाबदारी असेल.
  • महाराष्ट्रात दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या राज्यातून रेल्वेने दाखल होणाऱ्या प्रवाशांनाही RTPCR टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट बाळगावा लागेल. राज्यात दाखल होण्याच्या 96 तास आधी RTPCR टेस्ट केलेली असणे अनिवार्य आहे.
  • RTPCR टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट ज्या प्रवाशांकडे नाही, त्यांना कोरोना लक्षणे जाणवत आहेत का? याची पाहणी करण्यात येईल. त्यांच्या शरीराच्या तापमानाची नोंद केली जाईल. लक्षणे नसलेल्या प्रवाशांना गंतव्यस्थळी उतरल्यानंतर घरी जाण्याची परवानगी असेल.
  • कोरोनाची लक्षणे ज्या प्रवाशांमध्ये आढळतील त्यांना अँटिजेन टेस्ट करावी लागेल. अँटिजेन टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी मिळेल.
  • कोरोना पॉझिटिव्ह आढळणाऱ्या प्रवाशांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये पुढील उपचारांसाठी पाठवण्यात येईल. कोव्हिड केअर सेंटरमधील उपचारांचा खर्च प्रवाशांना स्वत:ला करावा लागेल.
  • रेल्वे स्टेशन ज्या परिसरात आहे, तिथले पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी नोडल ऑफिसर असतील. नियमांचं पालन केलं जाण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
  • महाराष्ट्राच्या सगळ्या सीमांवर येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनींग करण्यात येणार आहेत. लक्षणे आढळतील त्यांची त्वरित टेस्ट करण्यात येणार आहे.