बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत असल्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लावणार – राजेश टोपे


जालना – काल राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकट अद्यापही पूर्णपणे टळले नसून करोनाची लाट नव्हे, त्सुनामीची भीती असल्याचा इशारा दिला होता. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी संकट अद्याप टळलेले नसल्याचे सांगताना, त्यांनी रुग्णसंख्या वाढत असलेल्या इतर शहरांचे उदाहरण दिले होते. तूर्तास तरी पुन्हा लॉकडाऊन करण्याचा नसल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. दरम्यान राज्यात पुन्हा निर्बंध लावणार असून मुख्यमंत्र्यांचीही इच्छा असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

कोरोना संकटकाळात नागरिकांची बिनधास्त राहण्याची प्रवृत्ती वाढत असल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लावणार असल्याचे, राजेश टोपे यांनी म्हटले आहे. लॉकडाउन लावण्यात येणार नसला तरी शिथील करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लावण्यात येईल. मुख्यमंत्र्यांसोबतच्या पुढील दोन दिवसांत होणाऱ्या बैठकीनंतर घोषणा केली जाईल. राज्यातील नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नसल्यामुळे आता कठोर निर्णय घ्यावा लागणार असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राजेश टोपे यांनी यावेळी लग्न समारंभात २०० नागरिकांची संख्याही कमी करणार असल्याचे सांगितल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा निर्बंध लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा काही निर्बंध लागू करण्यासाठी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत लवकरच बैठक होणार असून त्यात निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले होते.

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे उपनगरी रेल्वेसेवा सर्वासाठी सुरू करण्याचा राज्य सरकारचा सध्या कोणताही विचार नाही. दिवाळी खरेदीसाठी व अन्य वेळीही राज्यातील बाजारपेठांमध्ये उसळत असलेली गर्दी, चौपाटय़ा, समुद्रकिनारे व अन्य पर्यटनस्थळी, सार्वजनिक ठिकाणी होत असलेली गर्दी यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी शाळा- महाविद्यालयांमध्ये आणखी उपाययोजना करणे, कोणतेही नियम न पाळता पर्यटन व सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांना प्रतिबंध करणे, सार्वजनिक ठिकाणी अनिर्बंध किंवा मुक्त वावर नियंत्रित करणे, विवाह व अन्य समारंभांसाठी पुन्हा २०० वरून ५० नागरिकांनाच हजर राहण्याची मुभा देणे, मास्क न वापरणाऱ्यांना दिल्लीच्या धर्तीवर अधिक दंड आकारणी करणे, अशा अनेक बाबींवर मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत चर्चा केल्यानंतर याबाबतचा निर्णय होईल,अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.