परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या 8 ते 10 दिवसांत लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेणार : अजित पवार


मुंबई : राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग दिवाळीनंतर पुन्हा एकदा वाढला असून हा वेग हिवाळ्यात आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. राज्यातील बर्‍याच शहरात कोरोना संक्रमण वाढले आहे. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाऊनचा मार्ग राज्य सरकार स्वीकारेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, परिस्थितीचा आढावा येत्या 8 ते 10 दिवसांत घेण्यात येईल, त्यानंतर लॉकडाऊनबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येईल.

अजित पवार म्हणाले की बरीच गर्दी दिवाळीच्या वेळी होती. अशीच परिस्थिती गणेश चतुर्थी दरम्यानही होती. संबंधित विभागांशी आम्ही बोलत असून पुढील 8-10 दिवस आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊ आणि नंतर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल. अजित पवार पुढे म्हणाले की, लोकांनी दिवाळीच्या वेळी अशी गर्दी केली जणू या गर्दीमुळे कोरोना मरणार आहे.

एक नियमावली राज्य सरकारने तयार केली आहे, ज्यामध्ये शिक्षकांची टेस्टिंगसह इतर नियम आहेत. याउलट महापालिका आणि जिल्हा परिषदा निर्णय घेऊ शकतात. परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, नागरिक पॅनिक होतील, असे मी बोलणार नाही, पाच सहा दिवसांत आढावा घेऊ, असेही पवार म्हणाले.

एक महिना मी रुग्णालयात असल्याने वीज बिलांबाबत जास्त माहिती नसल्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत काय चर्चा झाली हे देखील मला माहिती नाही. ज्यांची योग्यता नाही, पात्रता नाही, त्यांनी काय टीका करावी, शरद पवार दिल्लीतील नेते आहेत, विनाशकालीन विपरीत बुद्धी असे म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर दिली.

काँग्रेससोबत दुजाभाव होत असल्याच्या टीकेवर अजित पवार म्हणाले की गरज बघून वाटप होते, मी काही आज मंत्री झालेलो नाही. राज्य सरकार कार्तिकी एकादशीबाबत निर्णय घेईल. उपमुख्यमंत्री जात असतात किंवा सिनिअर जातात. मास्कची दिल्लीत जास्त कारवाई झाली आहे. आपल्याकडे कमी झाली, दिवाळीत आनंद होता म्हणून कारवाई केली नाही, आता करू, पाच सहा दिवसांत लॉकडाऊन बाबत सगळे चित्र सष्ट होईल. मला अधिकाऱ्यांची बैठक आचारसंहितेमुळे घेता आली नाही. पण लोकांना विनंती आहे, 500 रुपये न भरता मास्क वापरावे, एक तारखेनंतर मी बैठक घेणार आहे.