मुंबईत पुन्हा एकदा लागू होऊ शकतो लॉकडाऊन


मुंबई : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. कारण मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी गरज पडल्यास दिल्ली-मुंबई रेल्वे सेवा आणि विमानसेवा बंद करण्याचा पर्याय असल्याचे म्हटले आहे. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी 15 दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करा अशी मागणी केली आहे. पालकमंत्री आणि महापौरांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून मुंबई लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर जाऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय सांगितले.

देशाची राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचबरोबर अहमदाबादमधील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्याही वाढतीच आहे. या शहरांची परिस्थिती पाहता खबरदारी म्हणून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी काही मुंबई-दिल्ली रेल्वे आणि विमानसेवा रद्द करण्याचा पर्याय असल्याचे म्हटले आहे.

अस्लम शेख म्हणाले की, दिल्ली आणि गुजरातमधील ज्याप्रमाणे रुग्ण वाढत आहेत ते पाहता तेथील व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे. पण मुंबई आणि महाराष्ट्रातील रुग्णसंख्या नियंत्रणात असल्यामुळे रेल्वे, विमानसेवा बंद करायची किंवा त्या कशा चालवायच्या त्यासाठी नियमावली काय असेल यावर विचार सुरु आहे. उदाहरणार्थ दुबईला गेल्यास तिथे पोहोचल्यावर आधी आरटीपीआर केली जाते, मग हॉटेलमध्ये ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी चाचणी निगेटिव्ह आली तर शहरात फिरण्यासाठी परवागनी दिली जाते अन्यथा क्वॉरन्टाईन केले जाते. आपण तशी एसओपी आणू शकतो. ट्रेनसाठी काय करु शकतो त्यावर विचार करत आहोत. आरटीपीसीआर टेस्ट ट्रेनमधून येणाऱ्या प्रवाशांनी आधीच करुन मुंबईत यावे. त्यांना प्रवेश द्यायचा की क्वारंटाईन करायचा याचा विचार सुरु आहे. रुग्णसंख्या वाढू नये यासाठी टास्क फोर्स काम करत आहे. गरज पडली एसओपी आणू किंवा रेल्वे, विमानसेवा बंद करु.

तर दुसरीकडे 15 दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याची मागणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. त्यांनी ही मागणी कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने केली आहे. कोविड रुग्णांचा आकडा वाढल्याने मुंबईकरांनी सावध राहावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.