मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या कुटुंबियांच्या व्यवसायाचा खुलासा करावा – किरीट सोमय्या


मुंबई – भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्ती संदर्भात दिलेली माहिती तसेच रश्मी ठाकरे यांच्या जमीन खरेदीबाबत उपलब्ध झालेली कागदपत्रे पाहता ठाकरे कुटुंबियाचा व्यवसाय जमीन खरेदीचा की इमारती बांधण्याचा आहे, याबाबत मुख्यमंक्षी उद्धव ठाकरेंनी एकदा स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबत दिलेल्या माहितीची कागदपत्रे सोमय्या यांनी सादर केली. किरीट सोमय्या म्हणाले की, ३१ मार्च २०२० पर्यंत आदित्य ठाकरे हे हिबिस्कस फूड एलएलपी, एलिओरा सोलर एलएलपी या कंपन्यांचे डेझिग्नेटेड पार्टनर असल्याचे दिसत आहे. ते मंत्री बनल्यावर जवळपास ४ महिने एखाद्या कंपनीचे संचालक म्हणून कसे राहू शकतात? कंपनीचा डेझिग्नेटेड पार्टनर हे पद लाभाचे (ऑफिस ऑफ प्रॉफिट) नाही का? याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे त्यांनी सांगितले.

तसेच पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या खालापूर तालुक्यातील वैजनाथ येथील जमिनीचा उल्लेख उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रात आहे. एकाच सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीचा उल्लेख दोन वेळा या जमिनीचा उल्लेख करताना करण्यात आला आहे. हा प्रकार संशयास्पद आहे. ठाकरे परिवार व अन्वय मधुकर नाईक परिवारासोबत मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात ३० जमीन खरेदी करार झालेले दिसत आहेत. सदर जमीन लागवडीस अयोग्य असल्याचे स्पष्टपणे या सर्व व्यवहारांच्या सात बारा उताऱ्यांवर नमूद करण्यात आले आहे. काही प्रश्न या व्यवहारांवरून उपस्थित होत आहेत त्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा, अशी महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.


किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना विचारलेले प्रश्न
ठाकरे व वायकर या दोन्ही परिवारामध्ये व्यावसायिक संबंध आहेत का? त्यांची बिझनेस पार्टनरशिप आहे का? या दोघांनी अशाप्रकारे संयुक्त व्यवहार अन्यत्र केले आहेत का?

रश्मी उद्धव ठाकरे व मनिषा रविंद्र वायकर म्हणजे उद्धव ठाकरे व रविंद्र वायकर या दोन्ही परिवारामध्ये कोणत्या स्वरूपाचे आर्थिक संबंध आहेत?

कोर्लई येथील ३० जमीन खरेदीचे रश्मी उद्धव ठाकरे यांचे सात बारा उतारे आम्हांला सापडले आहेत. उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाने एकंदर ४० सात बारा उतारे आहेत, त्यापैकी ३० सात बारा उतारे हे रश्मी उद्धव ठाकरे व अन्वय मधुकर नाईक परिवाराचे आहेत.


हे सात बारा उतारे पाहिल्यास लक्षात येते की, ही जमीन लागवडीस अयोग्य असून सीआर झोनमध्ये ही जमीन आहेत का? मग ठाकरे परिवार व वायकर परिवाराचा या जागा विकत घेण्यामागे उद्देश काय होता? ठाकरे परिवाराचे उद्धव ठाकरे, रश्मी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे आर्थिक व्यवहार, प्रतिज्ञापत्रामधील माहिती बघितल्यास एक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेस पडत आहे की त्यांचा व्यवसाय काय आहे? बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनी किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये ठाकरे परिवाराचा भाग आहे का? पार्टनरशिप आहे का?

राज्यातील जनतेच्या मनात उत्सुकता आहे की मुख्यमंत्री ठाकरे परिवाराचा मूळ व्यवसाय काय? जमीन विक्री-खरेदी, बांधकाम क्षेत्र, इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या, ते अनेक कंपन्यांमध्ये संचालक होते, आहेत. त्याचबरोबर ते अनेक कंपन्यांमध्ये शेअरहोल्डर आहेत. तसेच अनेक कंपन्यांमध्ये ते पार्टनर दिसत असल्यामुळे त्यांचा मूळ व्यवसाय काय यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माहिती जाहीर करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.