कार्तिकी वारी मर्यादित वारकरी संख्येत पार पाडावी: विधानसभा अध्यक्ष


मुंबई: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार मर्यादित संख्येतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत ही वारी परंपरा पार पाडावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या. सांस्कृतिक आणि धार्मिक समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायास परंपरेनुसार वारीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असून त्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे, असेही ते म्हणाले.

विधानभवन येथे वारीदरम्यान येणाऱ्या समस्या आणि कोरोना पार्श्वभूमीवर वारीचे नियोजन करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांसह वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, कार्याध्यक्ष माधव शिवणीकर, विश्वस्त श्रीकांत महाराज ठाकूर, ज्ञानेश्वर तुळशिदास महाराज, नामदेव महाराज चौधरी, समस्त वारकरी फड दिंडी समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जळगांवकर, आदींसह वारकरी परिषद संस्थान यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी नाना पटोले म्हणाले, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूर येथील कार्तिकी वारी आणि ८ डिसेंबरला होणारी आळंदी वारी ही किमान वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडावी, याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येत आहे. वारीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत वारकऱ्यांच्या पालख्यांसाठी ३४ विश्रांतीस्थळांना कायमस्वरुपी जागा मिळावी. यासाठी ससर्वेक्षण करून जागा उपलब्ध करून देण्यात यावी. पालखीमार्गावरील रस्त्यांची डागडुजी, विविध रस्ते बांधणी योजनेंतर्गत पूर्ण करावी, दरवर्षी होणाऱ्या वारी व अन्य कार्यक्रमांसाठी न्यायालयाच्या आदेशांच्या अधिन राहून हे कार्यक्रम चंद्रभागेच्या वाळवंटात होतील यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही पटोले यांनी दिले.वारीला जाण्यासाठी फड परंपरेच्या दिंड्यांसाठी वारकऱ्यांशी समन्वयसाधून त्यांना एस.टी. महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्याचे निर्देशही अध्यक्ष पटोले यांनी दिले.