कॉमेडियन कुणाल कामराने संजय राऊत यांची घेतलेली बहुप्रतीक्षित मुलाखत रिलीज


मुंबई : स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने ‘शट अप यार कुणाल’ या पॉडकास्टमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांची घेतलेली मुलाखत रिलीज करण्यात आली आहे. अवघ्या देशाला या मुलाखतीत नेमके काय झाले याची उत्सुकता होती, ती आता संपुष्टात आली आहे. कंगना राणावत, सुशांत सिंह राजपूत, भाजप यांच्याबाबत कुणाल कामराने विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत भाष्य केले आहे. मुलाखतीतून बुलडोझरला पद्मश्री का दिला पाहिजे याचाही उलगडा झाला आहे.

कंगना राणावतची सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वक्तव्य चांगलीच चर्चेत होती. राज्य सरकार, मुंबई पोलीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर तिने सातत्याने टीका केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने तिच्यावर केलेली कारवाई चर्चेत आली होती. संजय राऊत यांनी या कारवाई बाबत बोलताना म्हटले की, कंगना अभिनेत्री आहे. तिने म्हटले होती की मी मुंबईत येत आहे, काय उखाडायचे उखाडा. त्यानुसार कंगनाच्या इच्छेनुसार मुंबई महापालिकेने बुलडोझर चालवून उखाडून टाकले. त्यानुसार सामनाने वृत्तांकन केले आणि शीर्षक ‘उखाड दिया’ असे केले होते. हे काम ज्या जेसीबीने केले त्याला पद्मश्री दिला जाणार आहे, असा मिश्किल टोलाही संजय राऊत यांनी लगावला. मुंबईत अनेक अनधिकृत बांधकामे आहेत. कंगनाचं ऑफिसचे बांधकामही अवैध होते. कंगनावरही झालेली कारवाईही कायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी सुशांत सिंहच्या आत्महत्येच्या प्रकरणावर बोलाताना म्हटले की, मी सुशांतला बिहारचा मानतच नाही. सुशांत मुंबईचा होता. बिहारमध्ये त्याला कोण ओळखत होते. मुंबईत त्याला ओळख मिळाली. तो मुंबईचा मुलगा होता, त्याला न्याय देणे आमची जबाबदारी आहे. पण आरडाओरड करुन सत्य लपणार नसल्याचे संजय राऊत म्हणाले. मुंबई पोलिसांनी केलेली चौकशी योग्यच होती. मुंबई पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा होता. देशातील सर्वोत्कृष्ट असे मुंबई पोलीस दल आहे. त्यांचा माफिया असा उल्लेख करणे चुकीचे आहे. तुमचे रक्षण मुंबई पोलीस करतात हे लक्षात ठेवायला हवे.

राऊत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, या सरकारच्या गोष्टी आहेत. मराठा आरक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, त्यावर लवकरच निर्णय होईल. पण आरक्षण जातीय आधारावर नसावे अशी भूमिका दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उघडपणे घेतली होती. व्यक्ती कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, गरीब गरजू नागरिकांना आरक्षण मिळायला हवे ही बाळासाहेबांची भूमिका होती. ज्यांनी मागासवर्गींयांमध्ये वर्षानुवर्षे आरक्षण घेतले आणि प्रगती केली त्यांनी आता आरक्षण सोडायला हवे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

त्यांनी प्रादेशिक पक्षांच्या प्रश्नावर बोलताना म्हटले की, प्रादेशिक पक्ष महत्त्वाची भूमिका निभावतात. त्याला जोडून राज ठाकरेंचा पक्षा वाढला पाहिजे या प्रश्नावर बोलताना त्यांनी म्हटले की, आपला पक्ष वाढवण्याचा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना अधिकार आहे. नेत्यांनी देशाच्या संविधानाच्या चौकटीत राहून आपला पक्ष वाढवला पाहिजे. लोकांनी तुम्हाला स्वीकारले तर तुमचा पक्ष मोठा होतो. मनसे काही वर्षांपूर्वी मोठा पक्ष होता.

त्यांनी यावेळी भाजपवरही निशाणा साधला. देश खुप मोठा आहे. एका पक्षावर आणि एका विचारधारेनेही देश चालणार नाही. अनेक पक्ष 60 वर्षात येऊन गेले. पण देश देश आहे. भाजपचा ट्रोल करणे, ब्लॉक करणे हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. भाजपसोबत 25 वर्षांचे भावनिक नाते होते. ते नातं तोडून नवीन आघाडी बनवताना दु:ख नक्कीच होते, असेही संजय राऊत म्हणाले.