दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजतील, नारायण राणेंचे सूचक वक्तव्य


मुंबई – भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी दिवाळीनंतर महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचे फटाके वाजतील, असे सूचक वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातील सरकारचे लवकरच फटाके वाजतील. या सरकारला काहीच जमत नसल्यामुळे लवकरच ती वेळ येईल. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. जोपर्यंत भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत फटाके वाजणार. तो काढायला गेले तर फार वेळ लागेल, त्यामुळे वेळ आल्यावर तोदेखील समोर आणू, असे नारायण राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे.

यावेळी फटाके फोडण्यावर राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधावरुनही नारायण राणे यांनी टीका केली. मी दिवाळीला फटाकेबंदी करण्याच्या मताचा नाही. तुम्ही सण साजरे करण्यात व्यत्यय आणता. फटाके वाजवून सगळीच लहान मुले, मोठे लोक आनंद लुटतात. तुम्ही तोदेखील घेऊ देत नाही. तुम्ही फक्त हात धुवा, अंतर ठेवा, घरात बसा एवढंच सांगतात. सर्वांनी दिवाळी साजरी केली पाहिजे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीदाला शोभणारे एकही काम केलेले नाही. मुख्यमंत्र्यांना पिंजऱ्यातून हात धुवा आणि अंतर ठेवा याच्या व्यतिरिक्त काही सांगता येत नाही. त्यांना राज्याचा अभ्यास नाही. ठाकरे कुटुंबियांचे बरेच जमीन व्यवहार आहेत. बाळासाहेब असेपर्यंत ठाकरे कुटुंबाची शिवसैनिकांसोबत पार्टनरशिप नव्हती. देवाण घेवाण करुन मातोश्रीवर व्यवहार होतात. आमदार, खासदारांना काही स्थान नसल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

शिवसेना शब्द पाळते, असे मला वाटत नाही. भाजपासोबत युती असताना दिलेले शब्द कुठे पाळले, गद्दारी का केली मग? भाजप केवढा मोठा पक्ष आणि शिवसेना कुठे. शिवसेनेची बिहारमध्ये काय दैना झाली..एकाचे तरी डिपॉझिट वाचवू शकले का? शिवसेनेने भाजपसोबत कोणतीही बरोबरी करु नये. त्यांची महाराष्ट्र सोडून कुठेही चांगली स्थिती नाही. महाराष्ट्रात जे ५६ निवडून आले त्यासाठी भाजपच कारणीभूत आहे. बिहारमध्ये उभ्या केलेल्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले याची लाज वाटली पाहिजे. शिवसेनेने आता टीका करणे बंद करावे, असा सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे.

शिवसेनेने नुसते जळत राहणे, बोटे मोडत राहणे यापलिकडे काही केलेले नाही. शिवसेनचे महाराष्ट्रात काय अस्तित्व आहे. आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. विकासकामे ठप्प आहेत. शेतकऱ्यांना पैसे मिळू शकत नाहीत. मदत जाहीर केली पण दिली नाही. जिल्ह्याला मिळणारे विकासाचे पैसे दिले जात नाही. सिंधुदुर्गाची वाईट अवस्था असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

बिहार निवडणुकीत मिळालेल्या यशाचे श्रेय नरेंद्र मोदींचे असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. बिहार निवडणुकीत आणि भारतात ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत्या त्या सर्व ठिकाणी भाजपला यश मिळाले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी या यशाचे मानकरी आहेत. त्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी जे काम केले त्याबद्दल जनतेने त्यांना हे श्रेय मिळवून दिल्याचे ते म्हणाले आहेत.