त्या कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी उद्धव ठाकरेंना अटक करणार का; सर्वोच्च न्यायालयात हरिष साळवेंचा सवाल


नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयात रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनासाठी सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वकील हरिश साळवे यांनी लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वी वेतन न मिळाल्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. मुख्यमंत्र्यांनी पगार न दिल्यामुळे या कर्मचाऱ्याला आत्महत्या करावी लागली. मग पोलीस आता उद्धव ठाकरे यांना अटक करणार का, असा सवाल अर्णब गोस्वामी यांचे वकील हरिष साळवे यांनी उपस्थित केला.

आज अर्णब गोस्वामी यांच्या अंतरिम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. अर्णब गोस्वामी यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी यावेळी युक्तिवाद केला. ज्याप्रकारे अर्णब गोस्वामी यांना अटक झाली, तशी अटक करण्याची पद्धत आहे का? अशाप्रकारे अटक करायला अर्णब गोस्वामी हे खुनी किंवा दहशतवादी आहेत का, असा सवाल हरिष साळवे यांनी उपस्थित केला.

सदोष मनुष्यवधाचा हा खटला नाही. मे 2020 पर्यंत अन्वय नाईक आत्महत्याप्रकरण शांत होते. तत्पूर्वी अर्णब गोस्वामी यांनी 21 एप्रिलला रिपब्लिक चॅनेलवरुन पालघरमधील साधुंच्या हत्येप्रकरणी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर 26 एप्रिलला अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांनी राज्य सरकारला तपास सुरु करण्यासंदर्भात पत्र लिहल्यामुळे राज्य सरकार याप्रकरणात सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे हरिष साळवे यांनी म्हटले. तसेच अन्वय नाईक यांनी त्यांच्या आईची हत्या करून आत्महत्या केल्याचेही हरिष साळवे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.

सर्वोच्च न्यायालयात रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामिनाच्या याचिकेवर होत असलेल्या तातडीच्या सुनावणीवर बार कौन्सिलचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अर्णब गोस्वामी यांना लगेचच कशी सुनावणी मिळते. अर्णब गोस्वामी यांच्यावर एवढी मेहरबानी का, असा सवाल दुष्यंत दवे यांनी उपस्थित केला आहे.