राज्यातील विद्यार्थ्यांना यंदाच्या दिवाळीची फक्त पाच दिवस सुट्टी


मुंबई – राज्यातील शाळा कोरोना पार्श्वभूमीवर मागील सात-आठ महिन्यांपासून बंद आहेत. पण मार्चपासून शाळा या ऑनलाइन घेण्यास सुरुवात झाली. ऑनलाइन वर्गांना उन्हाळा तसेच गणेशोत्सवामध्येही सुटी देण्यात आली नसल्यामुळे आता दिवाळीमध्ये तरी सुट्या मिळतील अशी अपेक्षा पालक-विद्यार्थी तसेच शिक्षकांना होती. पण केवळ पाच दिवसांची सुटी राज्य सरकारने जाहीर केली आहे. केवळ 12 ते 16 नोव्हेंबर या पाचच दिवसांसाठी राज्य सरकारने ऑनलाइन वर्गांना सुटी दिली आहे. ऑनलाइन वर्ग या पाच दिवसांमध्ये बंद असणार असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. पण त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

व्यवसाय, शिक्षणासह अनेक गोष्टी कोरोनामुळे विस्कळीत झाल्या. कोरोनाचा परिणाम सण उत्सवांवरही झाला. साधेपणाने गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव हे सर्व सण साजरे करावे लागले. उन्हाळी सुट्टीपासून सुरू असलेल्या ऑनलाइन वर्गांना एक-दोन दिवस सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे दिवाळीमध्ये मोठी सुट्टी जाहीर केली जाईल अशी अपेक्षा पालक, विद्यार्थी व शिक्षकांना होती. पण शालेय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने 12 ते 16 नोव्हेंबरदरम्यान दिवाळीमुळे शाळांना फक्त पाच दिवसच सुट्टी जाहीर केली आहे. या काळात शाळांचे ऑनलाइन वर्ग बंद राहतील.