मुंबई – भाजपचे नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मेट्रो कारशेडच्या प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरीत्या उद्या होणाऱ्या 50 हजार कोटीच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी काँग्रेस सोबत करत आहात की काय? असा सवाल केला आहे. त्याचबरोबर मेट्रोच्या विषयावर लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा थेट चर्चेला या! आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार असल्याचे आव्हान शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे.
मा.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेजींना जाहीर आवाहन..
आपण लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार! @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/ecVzpt7R3o— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 6, 2020
आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मेंट्रो कारनशेड बाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या पत्रात त्यांनी म्हटले की, कांजूर मार्गच्या जागेवर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेड प्रस्तावित केले आणि महाराष्ट्रातील इंच इंच जमीन महाराष्ट्राची अशी भावनिक अस्मितेची ढाल करून जनतेची दिशाभूल केली जात आहे, त्याबद्दल स्पष्ट करू इच्छितो की, सदरहू जागा महाराष्ट्राची नसून केंद्र सरकारचीच आहे. केंद्र सरकार कडून १९८३ साली असा पहिला दावा करण्यात आला. कॉंग्रेसचेच त्यावेळी सरकार होते. म्हणजेच मुंबई मधील कांजूर मार्गची जी जागा आपण प्रस्तावित करत आहात, ती महाराष्ट्राची नाही असा दावा त्यावेळच्या केंद्रातील कॉंग्रेसच्या सरकारने केला होता. ज्यांच्या सोबत आपण आज महाराष्ट्र विकास आघाडीत आहात.
१९८३ साली असलेल्या केंद्र सरकारने म्हणजेच काँग्रेसने कांजूर मार्गची जागा महाराष्ट्र सरकारची म्हणजेच महाराष्ट्राची असा दावा केलेला नाही. सदर जागा ही महाराष्ट्राचीच असल्याचा २०१४ चा दावा आणि त्यावरील अंतिम निर्णय ज्यामुळे ही जागा महाराष्ट्राच्याच नावावर करण्यात यावी, हा दावासुद्धा २०१४ साली करण्यात आला. याचा अर्थ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि यांच्या सरकारने हा दावा केला. दुर्दैव महाराष्ट्राचे एवढेच की ज्यांनी ही जागा दिल्लीची आहे, असे सांगणाऱ्या कॉंग्रेसच्या सोबत तुमची सलगी केली आहे आणि ही जागा ज्यांनी महाराष्ट्राचीच आहे असा निर्णय दिला त्या भाजप विरोधात तुम्ही लढता आहात.