डिसेंबरपासून राज्यातील सर्व जनजीवन येईल पूर्वपदावर; वडेट्टीवार यांची माहिती


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लागू असलेला लॉकडाऊन आता टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. ठाकरे सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील बहुतांश गोष्टी सुरु केल्या आहेत. त्यानुसार गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली चित्रपट आणि नाटय़गृहे सुरु करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. दरम्यान मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नोव्हेंबरच्या अखेपर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल अशी ग्वाही प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

मुंबई लोकल सुरु करण्यासंबंधी लवकरच राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकार आणि रेल्वेवर यावेळी त्यांनी निशाणा साधला. रेल्वे सुरु करण्यासंदर्भात आम्ही चार पत्रे पाठवली होती. रेल्वेकडून त्याला परवानगी न देता काही त्रुटी काढल्या जात आहे. केंद्र सरकार आणि रेल्वेला क्रेडिट घ्यायचे असेल तर त्यांनी घ्यावे. तीन पत्रे आम्ही रेल्वे विभागाला पाठवली आहेत. त्यावर सुरक्षेसाठी काय करणार, गर्दी टाळण्यासाठी काय करणार असे प्रश्न आम्हाला विचारण्यात येत आहेत. सगळी यंत्रणा आम्ही राबवत आहोत. लवकरच राज्य सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात लागू असलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत असून राज्यातील स्थिती या महिनाअखेर पूर्वपदावर आणली जाईल. सर्व जनजीवन डिसेंबरपासून पूर्वपदावर येईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

राज्यातील विरोधी पक्षाकडून धार्मिळस्थळे सुरू करण्याची मागणी करण्यात येत असली तरी अद्याप तरी धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला नाही. मंदिरांची कुलुपे उघडण्याचा इशारा भाजप आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी दिला तरीही सरकारने धार्मिक स्थळांबाबतचा निर्णय घेतलेला नाही. राज्यात धार्मिकस्थळे आणि शाळा-महाविद्यालयांवरच सध्या तरी निर्बंध लागू आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील आठ महिन्यांपासून बंद असलेली चित्रपट आणि नाटय़गृहे आजपासून (गुरुवार) खुली होणार असल्यामुळे लाखो नागरिकांना रोजगार देणारा मनोरंजनाचा महत्त्वाचा उद्योग पुन्हा श्वास घेताना दिसेल. दिवाळी जवळ आल्याने चित्रपटगृहे आणि नाटय़गृहे सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी या क्षेत्रांतून करण्यात येत होती. ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाटय़गृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

लवकरच यासंदर्भातील नियमावली सांस्कृतिक कार्य विभाग जाहीर करणार आहे. कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ सिनेमागृह, नाटय़गृहात नेण्यास मनाई करण्यात आली आहे. अंतरनियम राखण्याच्या आणि आरोग्याची काळजी घेण्याच्या अटींवर बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश, शूटिंग आदी सर्वप्रकारच्या बंदिस्त क्रीडाप्रकारांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे योग संस्थांनाही परवानगी देण्यात आली आहे.

राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना सरावासाठी तरणतलावांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त खेळाडू असा उल्लेख असल्याने सर्वसामान्यांना लगेचच तरणतलावाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर राज्य सरकारने मुंबईत सर्वाना उपनगरीय रेल्वेतून प्रवासाची मुभा देण्याबाबत सकारात्मकता दाखविली असली तरी रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे त्याबाबतचा कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही. सभागृहे तसेच राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम, सोहळ्यांवरील बंदी कायम राहणार आहे.