केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने अर्णब गोस्वामींना अटक – चंद्रकांत पाटील


मुंबई – वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील राहत्या घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 2018चे हे प्रकरण असताना आता गोस्वामी यांना अटक करण्यात येत आहे. आतापर्यंत पोलीस झोपले होते का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अर्णव गोस्वामी प्रकरणी राज्य सरकार आणि पोलिसांना धारेवर धरले आहे. इतर कोणत्याही प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अडकावता येणार नाही म्हणून त्यांना एका वास्तुविशारदाच्या आत्महत्या प्रकरणी अडकवण्यात येत आहे. ही केस 2018 सालीच बंद झाली होती. केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने ती पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. आज भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना घडली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो, असे पाटील यांनी म्हटले आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने अर्णव गोस्वामी यांना अटक केल्याप्रकरणी मोर्चा काढावा, उपोषण करावे आणि आंदोलन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. अर्णव अटक प्रकरणी सोशल मीडियावरूनही आवाज उठवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. राज्यात हुकूमशाही लागू करू शकतो, असे या सरकारला वाटत आहे. पण महाराष्ट्रात हा प्रकार कदापिही खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

इंदिरा गांधींच्या आणीबाणीची जाणीव आजच्या पिढीला देखील करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो. जनतेने त्यावेळी देखील सरकारला संविधानाच्या विरुद्ध कारवाई करताना थांबविले होते, आता देखील थांबवत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.