राज्य सरकारच्या अधिकारांचे केंद्र सरकारकडून हनन; सुप्रिया सुळेंचा आरोप


मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारला मेट्रो कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर त्यावर आता राजकारण होत असल्याचे चित्र दिसत आहे. या जागेवर केंद्राकडून दावा केल्यामुळे कांजूरमधील मेट्रो कारशेडच्या जागेबाबत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावरुन केंद्र सरकारवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. राज्याच्या अधिकारांचे केंद्र सरकारकडून हनन करण्यात येत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

केंद्राने मुंबईतील कांजूरमधील मेट्रो कारशेडच्या जागेवर दावा करत राज्य सरकारने आपली अधिसूचना तातडीने थांबवण्याची सूचना केंद्र सरकारने एका पत्राद्वारे केली आहे. त्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. राज्यातील जनतेची राज्य सरकारकडून दिशाभूल केली जात असल्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्राच्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करत केंद्र सरकारकडून एक धक्कादायक गोष्ट कळली आहे. कांजूर येथील ती जमीन महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते, त्याचा त्यावर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार सातत्याने राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे काम करत आहे. त्यांच्या कृतीतून ते दिसत आहे, हे दुर्दैवी आणि निंदाजनक असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कोणत्या आधारावर भाजपचे नेते टीका करत आहेत. ती जमीन महाराष्ट्राची आहे, त्याचा विकास कामासाठी वापर केला जात आहे. केंद्र सरकार देशात हळूहळू आणीबाणी आणत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. मी कधीच मंदिरांचे टाळे तोडण्याची भाषा ऐकलेली नाही. हे दुदैवी आहे, सत्ता नसल्यामुळे कदाचित त्यांना काहीच सूचत नसल्यामुळे कदाचित असे ते बिचारे असे वागत असतील. त्याचबरोबर त्यामुळे त्यांचा समतोल कदाचित बिघडला असावा, असा जोरदार टोला भाजपला सुळे यांनी यावेळी लगावला.