येत्या दोन दिवसांत होईल अकरावी प्रवेशाबाबत निर्णय – शिक्षण मंत्री


मुंबई – राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी येत्या दोन दिवसांत अकरावी प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दिल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ऑनलाईन अॅडमिशन होऊनही अर्धी रखडलेली प्रवेश प्रक्रिया आता पूर्ण होण्याची शक्यता आहे.

याबाबत माहिती देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, सातत्याने ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत प्रश्न विचारला जात आहे की कधीपासून अभ्यासक्रम सुरु होणार आहे. कारण अकरावीचे काही प्रवेश बाकी आहेत. पण आपल्याला हे माहिती आहे की मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आजच महाअधिवक्त्यांशी चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहे. त्यानंतर येत्या दोन दिवसांत याबाबतचा निर्णय घेतला जाईल. दरम्यान, ऑनलाइन-ऑफलाइन प्रवेश झाले आहेत. तसेच ऑनलाइन अभ्यासाचा लाभ प्रवेश न झालेल्या विद्यार्थांनाही घेता येणार असल्याचे यावेळी गायकवाड यांनी सांगितले.