कोणतेही राजकारण न करता लोकलसंदर्भात रेल्वेने सहकार्य करावे – अनिल देशमुख


मुंबई – रेल्वे प्रशासनाने मुंबईमधील लोकल सेवा सुरु करण्यासाठी सहकार्य करावे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. कोणतेही राजकारण यामध्ये आणले जाऊ नये, असेही त्यांनी रेल्वे प्रशासनाला खडसावले आहे. राज्य सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेला अनिल देशमुखांनी यावेळी वेळापत्रक सुचवल्याचेही सांगितले.

गेल्या सात महिन्यांपासून लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली लोकल सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला तसेच काही ठराविक प्रवाशांसाठी सुरु आहे. दरम्यान मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली असून रेल्वेला यासंबंधी विनंती करणारे पत्र देखील पाठवले आहे. लोकल प्रवासासाठी राज्य सरकारने वेळापत्रक तयार केले असून तेदेखील पत्रासोबत जोडण्यात आले आहे.

यानंतर मुंबई लोकल सुरु करण्यामध्ये रेल्वेकडून असमर्थता दर्शवण्यात आली असून अडचणींचा पाढा वाचण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला सहकार्य करावे, अशी विनंती अनिल देशमुख यांनी केली आहे. रेल्वेने जर सहकार्य केले तर अडचणींचा सामना लोकांना करावा लागणार नाही. यामुळेच कोणतेही राजकारण न करता रेल्वेने सहकार्य करावे, असे ते म्हणाले आहेत.