कर्मचाऱ्यांचे थकित वेतन देण्यासाठी २००० कोटींचे कर्ज काढणार एसटी महामंडळ


मुंबई – मागील अनेक महिन्यांपासून कोरोना संकटामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. त्यातच आता सणा सुदीलाही सुरुवात झाली आहे. त्यातच अवघ्या काही दिवसांवर दिवाळीही येऊन ठेपली आहे. इंधन खर्च आणि इतर गोष्टींसाठी पैसा लागणार असून त्याकरिता एसटी महामंडळ २ हजार कोटींचे कर्ज काढणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. तसेच राज्य सरकारकडे ३६०० कोटींचा प्रस्ताव देण्यात आल्याचीही माहिती त्यांनी पत्रकार परिषदेते दिली.

एसटीला कोरोनाकाळात मिळणारे २२ कोटींचे उत्पन्न न मिळाल्यामुळे एसटीचा संचित तोटाही वाढला आहे. साडे पाच हजार कोटींचा हा तोटा आहे. उत्पन्नाची साधने संचित तोटा वाढल्यानंतर वाढली पाहिजे. नाही तर तोटा वाढतो. उत्पन्नाची साधने कोरोनामुळे वाढण्याऐवजी उत्पन्नच बंद झाल्यामुळे हा तोटा वाढला आहे. त्यामुळे कामगारांचे तीन महिन्यांचे पगारही थकले आहेत.

त्यातच दिवाळी सारखा सण आल्याने कामगारांना पगार मिळाले पाहिजेत म्हणून आम्ही सरकारकडे ३६०० कोटींचा प्रस्ताव दिला आहे. राज्याला कोरोनामुळे मोठा तोटा सहन करावा लागल्याने एसटीला मदत करावी, अशी शासनाचीही परिस्थिती नसल्यामुळे आम्ही कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे दोन हजार कोटींचे कर्ज काढण्यात येईल, असे परब म्हणाले आहेत.