राज्यपालांच्या सल्ल्यानुसार राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन


मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल वाढीव वीज बिलाबाबत राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना याप्रकरणी तुम्ही शरद पवारांशी बोलून घ्या असा सल्ला दिला होता. राज ठाकरेंनी राज्यपालांच्या या सल्ल्यानुसार शरद पवारांना फोन करून वाढीव वीज बिलांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. राज ठाकरे यांनी आपल्याला फोन केल्याची माहिती खुद्द शरद पवार यांनीच दिली आहे.

शरद पवार याबाबत बोलताना म्हणाले, मला राज ठाकरे यांचा फोन आला होता. पण भेटण्याबाबत ठरलेले नाही. मी बाहेरगावी चाललो आहे. राज्यपालांनी फोन करायला सांगितल्याने मी फोन केल्याचे राज ठाकरे यांनी शरद पवारांना सांगितले. राज्यातील वीज ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळात अव्वाच्या सव्वा रकमेची वीज बिले आली आहेत. यातून राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. काल राजभवनवर जाऊन राज ठाकरे यांनीही राज्यपालांची भेट घेतली आणि हिच मागणी केली होती.