नितीशकुमार हे पुन्हा निवडणुकीनंतर भाजपाला धोका देतील – चिराग पासवान


पाटणा – आज सकाळपासून बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांच्यावर परत एकदा लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी हल्लाबोल करत भाजपाला नितीशकुमार हे पुन्हा धोका देतील, असे म्हटले आहे.

नितीशकुमार निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाला धोका देतील आणि राजदसोबत जातील, असे वक्तव्य चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या बिहार दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केले आहे. त्यांनी याद्वारे बिहारच्या राजकारणाला एक नवा ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. नितीशकुमार यांच्या जदयूने सन २०१५ मध्ये बिहारच्या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या राजदसोबत निवडणूक लढवली होती. राजद यामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला होता. दोघांच्या युतीमुळे नितीशकुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले होते.

त्यानंतर नितीशकुमार यांनी काही काळानंतर उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्यावरील कथित घोटाळ्यांच्या आरोपांमुळे युती तोडत भाजपासोबत सरकार स्थापन केले होते. चिराग पासवान यांनी यापार्श्वभूमीवर हे वक्तव्य केले आहे. चिराग यांनी सातत्याने नितीशकुमार यांच्यावर हल्ला केला आहे. जदयूमुळे एनडीएतून माघार घेत ते स्वतंत्रपणे निवडणूकही लढवत आहेत.