नितीश कुमारांना निवृत्त करुन भाजप उमेदवाराला बिहारचा मुख्यमंत्री करण्याचा डाव – ओवैसी


नवी दिल्ली – बिहारच्या कैमूर जिल्ह्यात घेतलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी निशाणा साधला आहे. पाकिस्तान आणि ओवैसीचे नाव बिहारच्या विधानसभा निवडणुकीत जाहीर सभेत घेतले जात आहे. आता भाजपला बिहारमध्ये ओवैसी दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर भाजप नितीश कुमार यांच्याविरोधात कट रचत असून भाजप त्यांना निवृत्त करून आपल्या आमदाराला बिहारचा मुख्यमंत्री करण्याची तयारी करत असल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे.

असदुद्दीन ओवैसी यांनी कैमूरमध्ये एका सभेला संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते. महायुतीच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात बिहारमधील जनता भरडली गेली आहे. अनेक तरुण पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कारकिर्दीत बेरोजगार झाले आहेत. गरीबीत ते ढकलले गेले आहेत. मुख्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांना बनवा. तरच बिहारच्या जनतेला न्याय मिळेल, असे ओवैसी यांनी म्हटले आहे.

कैमूरमधील 70 टक्के धान गिरण्या नितीश सरकारच्या काळात बंद झाल्या आहेत. बिहारमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले, तेव्हा त्यांनी आपले नाव घेतले. पण बिहारमध्ये ओवैसी कसे दिसले? मुख्यमंत्री योगींनी बिहारमध्ये आल्यावर बिहारबद्दल बोलायचे होते. पण ते पाकिस्तान आणि माझ्याबद्दल बोलत असल्याचे ओवैसी म्हणाले. तसेच ओवैसींनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. आपल्या समोर मी नतमस्तक आहे. गलवान खोऱ्यात बिहारच्या त्या वीर जवानांनी चीनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर देत देशासाठी बलिदान दिल्याचे ओवैसी म्हणाले.

त्या शूर जवान आणि त्यांच्या आई-वडिलांना सलाम करतो. पण आपली मुले ज्या मातांनी गमावली त्यांच्या मुलांच्या बलिदानाचा बदला मोदींनी चीनकडून घेतला की नाही? याचे उत्तर आधी पंतप्रधान मोदींनी द्यावे, असे ओवैसी यांनी म्हटले आहे. भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून बिहारमध्ये एका वर्षाच्या आता 19 लाख रोजगार देण्याचे आश्वासन दिलं आहे. तर 10 लाख रोजगार देऊ, असे आरजेडीने म्हटले आहे. बिहारवर या दोघांनी 15 – 15 वर्षे राज्य केले, त्या दरम्यान किती नोकर्‍या दिल्या? असा प्रश्न ओवैसींनी विचारला आहे.