आयातीपेक्षा निर्यातीला प्राधान्य दिल्यास तर तरुणांचा उद्रेक होईल – रघुराम राजन


मुंबई : आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत आयातीवरील अवलंबित्व कमी करून निर्यातीला प्राधान्य देण्याचे केंद्रातील मोदी सरकारने ठरविले आहे. पण, यावरुन आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी हे धोकादायक असल्यामुळे नवीन रोजगारनिर्मिती होणार नाही आणि पर्यायाने संतप्त तरुणांचा उद्रेक होईल, असा इशारा दिला आहे.

सोशल मीडिया आणि फेक न्यूज यांचा वापर करून लक्ष विचलित करता येते, पण असे प्रयत्न अखेरीस अपयशी ठरतात, असे सूचक वक्तव्यही रघुराम राजन यांनी यावेळी केले. दुसरीकडे बेरोजगार तरुणांचे लक्ष वळवता येईल, पण ते फारच अल्प काळासाठी असेल. त्यांना जर रोजगार मिळाला नाही तर अखेर ते रस्त्यावर उतरतील, असे राजन म्हणाले.

रघुराम राजन एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च या संस्थेच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये बोलत होते. राजन यांनी यावेळी आत्मनिर्भर भारत या उपक्रमांतर्गत आयातीपेक्षा निर्यातीवर भर देण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांबद्दलही इशारा दिला. यापूर्वीही देशात निर्यातीला प्राधान्य देण्याचे प्रयत्न झाले असून आतापर्यंत ते अयशस्वी ठरले आहेत, याकडेही राजन यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

निर्यातीचे प्रमाण वाढवायचे असेल तर आयातही वाढली पाहिजे. आपली निर्यात स्वस्त ठेवण्यासाठी देशातील निर्यातदारांना आयात करण्याची गरज असते. इतर देशांतून विविध कच्च्या मालांची चीनने आयात केली आणि त्याचा वापर करून उत्पादित केलेल्या मालाची निर्यात केल्यामुळे चीन हा सर्वांत प्रबल निर्यातदार देश बनल्याचे यावेळी राजन यांनी आवर्जुन सांगितले. देशांतर्गत उत्पादनासाठी कमी शुल्क आकारून उत्पादननिर्मितीला पोषक वातावरण तयार केले पाहिजे, असे मतही यावेळी राजन यांनी व्यक्त केले.