आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हवाई आणि समुद्री मार्गाने भारतात प्रवेश करण्यास परवानगी


नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊन आता अनलॉकमध्ये परावर्तित होऊ लागला आहे. त्याचबरोबर या अनलॉक दरम्यान देशातील अनेक गोष्टी अटी व शर्थींवर सुरु झालेल्या असतानाच केंद्र सरकारने आता व्हिसावरील निर्बंध सुद्धा शिथील केले आहेत. जर भारतात ओसीआय आणि पीआयओ कार्डधारकांना तसेच परदेशी नागरिकांना यायचे असेल, तर हवाई आणि समुद्री मार्गाने त्यांना प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली आहे. फक्त पर्यटन व्हिसाला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.


केंद्रीय गृहमंत्रालयाकडून इलेक्ट्रॉनिक व्हिसा आणि पर्यटक व्हिसा वगळता सर्व व्हिसा तात्काळ प्रभावाने पूर्ववत करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. वैद्यकीय उपचारासाठी परदेशी नागरिकांना भारतात यायचे असेल, तर ते त्यांच्यासह देखभाल करणाऱ्या व्यक्तींच्या वैद्यकीय व्हिसासाठी अर्ज करु शकतात. जर व्हिसाची मुदत संपली असेल तर, ते नव्याने व्हिसासाठी अर्ज करु शकतात. व्यवसाय, कॉन्फरन्स, नोकरी, अभ्यास, संशोधन आणि वैद्यकीय उपचारांसाठी परदेशी नागरिक या निर्णयामुळे भारतात येऊ शकतात. कोरोनाचा प्रादुर्भाव फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून व्हिसावर सुद्धा निर्बंध घालण्यात आले होते.