जलयुक्त शिवारासंदर्भात जी चौकशी करायची आहे, ती जरूर करा : देवेंद्र फडणवीस


उस्मानाबाद : राज्य सरकारला जलयुक्त शिवारा संदर्भात जी काही चौकशी करायची आहे, त्यांनी ती जरूर करावी, असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबादमधील पत्रकार परिषदेत म्हटले आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच ही चौकशी एसआयटीमार्फत होणार असल्याचेही सांगण्यात आल्यामुळे यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला खुले आव्हान दिले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस जलयुक्त शिवारासंदर्भात म्हणाले की, जलयुक्त शिवारासंदर्भात जी काही चौकशी राज्य सरकारला करायची आहे, ती त्यांनी जरूर करावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही काही मंत्रालयात सह्या करून टेंडर दिलेली कामे नाहीत. त्याठिकाणी सहा लाख कामे झाली आहेत. या सहा लाख कामांपैकी सर्व कामे ही विकेंद्री पद्धतीने झाली. जिल्हाधिकारी याचे प्रमुख होते. जिल्हा परिषदेने, कृषी विभाग, जलसंधारण विभाग, वन विभाग यासर्व विभागांनी त्याअंतर्गत कामे केली. साधारणपणे ही कामे अॅव्हरेज एक लाखांपासून ते पाच लाखांपर्यंतची आहेत. स्थानिक लेव्हलवरच याचे टेंडर्स निघाले आहेत आणि ही कामे करण्यात आलेली आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की, यासंदर्भात बोलताना मी मंत्र्यांचे ऐकले तेव्हा त्यांनी सांगितले की, 700 तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. सहा लाख कामांमध्ये सातशे तक्रारी मला असे वाटते की, अर्धा टक्का देखील नाही. म्हणजे, एकही टक्का तक्रारी येऊ नयेत. पण साधारणपणे जी काही सरकारी कामे होतात त्यात पाच ते सात टक्के तक्रारी किमान असतात. सहा लाख कामे होऊन अर्धा टक्काही तक्रारी त्यामध्ये आलेल्या नसल्यामुळे जाणीवपूर्वक याठिकाणी चौकश्या लावल्या जात आहेत.

मी सरकारला एवढेच सांगू इच्छितो, जर सरकारला असे वाटत असेल की, अशाप्रकारे चौकश्या लावून विरोधी पक्षनेत्याचे तोंड बंद करता येईल, तर त्यांनी ते विसरून जावे. विरोधी पक्षनेता हा जनतेचा आहे. तो जनते करताच काम करत राहणार आहे. शेतकऱ्यांवर आलेले संकट संपू द्या. जलयुक्त शिवार योजनेचा किती मोठ्या प्रमाणात फायदा झाला, हे आम्ही प्रत्येक गावात, तालुक्यात जाऊन शेतकऱ्यांचे मत नोंदवणार आहोत. त्याचे आम्ही प्रदर्शनच मांडणार आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.