खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवारांचे महत्वपूर्ण वक्तव्य


तुळजापूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच एकनाथ खडसेंनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिल्याच्या बातम्यासुद्धा चर्चेत होत्या. अशात राष्ट्रवादीमध्ये खडसे हे प्रवेश करणार, असे वातावरण सध्या राज्यात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

भाजपने खडसेंची दखल घेतली नाही, पण काय तो राजकीय निर्णय त्यांनी घ्यावा, असे वक्तव्य शरद पवारांनी यांनी केले आहे. ते म्हणाले की, एकनाथ खडसे हे 20 वर्षात विरोधात असताना सर्वात प्रभावी नेते होते. पण भाजपने त्याची नोंद घेतली नाही. मला सोडून गेलेले काही संपर्कात आहेत. पण त्यांना परत घेताना काही निकष आहेत. उस्मानाबादमध्ये सोडून गेलेल्या नेत्यांना आता राष्ट्रवादीत पुन्हा एन्ट्री नाही, आहे तिथे सुखाने राहा, असे देखील पवारांनी म्हटले आहे.

शरद पवार खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेबद्दल बोलताना म्हणाले की, खडसे विरोधी पक्ष नेते होते, तेव्हा ते आक्रमक आणि खूप सक्रिय होते. त्यांचे कार्य मोठे आहे. राजकीय निर्णय काय घ्यावा तो त्यांचा प्रश्न आहे. पण 20 वर्षात विरोधात असताना खडसे सर्वात प्रभावी नेते होते. पण भाजपने आता त्यांची नोंद न घेतल्यामुळे जिथे नोंद घेतली जाते तिथे जावे, असे कदाचित खडसे यांना वाटत असावे.

दरम्यान, यावेळी बोलताना पवार यांनी डॉ. पदमसिंह पाटील आणि आमदार राणाजगजीतसिंह यांचं नाव न घेता वक्तव्य केले आहे. पक्ष स्थापनेपासून सोबत असलेले व नातेवाईक असलेले डॉ पदमसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणा यांनी ऐन निवडणुकीत पवारांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पवार वैयक्तिकरित्या खूप दुखावले होते. पवारांच्या या वक्तव्याने पाटील परिवारासाठी राष्ट्रवादी पुन्हा प्रवेशाची दारे कायमची बंद झाली आहेत. राणा पाटील हे सध्या तुळजापूर मतदार संघाचे भाजप आमदार आहेत.