चिखल पाण्यातून वाट काढत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधावर पोहोचले देवेंद्र फडणवीस


मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी. राज्याला केंद्र सरकार सहाय्य करेलच. पण टोलवाटोलवी न करता आधी राज्य सरकारने मदतीची घोषणा करावी, असे म्हटले आहे. राज्य सरकारने केंद्राची वाट न पाहता मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. केंद्रावर सगळेच ढकलायचे असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी आहे, त्यांचे काय काम, असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. आजा फडणवीस यांनी अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी पावसाच्या पाण्यातून आणि चिखलातून मार्ग काढला.


फडणवीस यांनी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी आपल्या दौऱ्याला बारामतीमधून सुरुवात केली. यावेळी, त्यांनी यावेळी काही शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंतही पावसाच्या पाण्यामुळे जाता येत नसल्याची खंत बोलून दाखवली. तसेच, दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील रस्ता पूर्णपणे खचला असून घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे, त्याला तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. यावेळी, फडणवीस यांनी पाण्यातून आणि चिखलातून वाट काढत बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.


कोणीच सोयीस्कर राजकीय भूमिका घेऊ नये. सगळ्याच नेत्यांना मदत कशी मिळते हे माहिती आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको. पंचनाम्यांच्या भानगडीत न पडता राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी. केंद्र सरकार मदत करेलच. पण पहिली जबाबदारी राज्य सरकारची असल्यामुळे राज्याने तातडीने मदत करावी. केंद्राच्या मदतीची वाट राज्य सरकारने बघत राहू नये. ते स्वत: काय करणार ते त्यांनी आधी सांगावे, असेही फडणवीस म्हणाले.