महाविकास आघाडी सरकारचा पप्पूसेना असा उल्लेख करत कंगणाचा निशाणा


मुंबई : बॉलिवूड क्वीन अर्थात अभिनेत्री कंगणा राणावत हिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिच्याविरोधात महाराष्ट्रातील शिवसेना सरकारने नवीन एफआयआर दाखल केल्याचा दावा खुद्द कंगणा राणावतने केला. माझ्याशिवाय महाराष्ट्रातील पप्पूसेनेला करमतच नसल्याचा टोला देखील तिने यावेळी लगावला आहे. नवरात्रीचे काही फोटो कंगणाने ट्विटरवरुन शेअर केले आहेत. तिने त्यावेळी महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख पप्पू सेना करत पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

कंगणा आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाली की, कोणी कोणी नवरात्रीमध्ये उपवास ठेवला आहे? हे काही फोटो नवरात्रीनिमित्त काढले आहे. कारण मी स्वतः उपवास ठेवला आहे. माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमतच नाही. माझी एवढी पण आठवण काढू नका, मी लवकरच येणार आहे.


कंगणा राणावत विरोधात देशद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगणावर लावण्यात आल्यामुळेच तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. कलम 124 अ, 153 अ, 295 अ, 34 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगणाची बहीण रंगोली विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयासमोर पुरावे म्हणून कंगणावर गुन्हा दाखल दाखल करण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तीने कंगणा राणानतचे सर्व ट्वीट्स आणि व्हिडीओ सादर केले होते. त्यानंतर न्यायालयाने कलम 156 (3) अंतर्गत कंगणा विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. एफआयआर दाखल केल्यानंतर कंगणाची चौकशी होणार आणि जर कंगणा विरोधात पुरावे मिळाले, तर कंगणाला अटकही केली जाऊ शकते.