मुंबई – ‘कॅग’ने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतील गैरकारभारावर ताशेरे ओढल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाने या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. विरोधकांकडून राज्य सरकारच्या निर्णयावर टीका होत आहे. तर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. जलयुक्त शिवार योजनेचा मुद्दा या बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यावर झालेल्या चर्चेनंतर मंत्रिमंडळाने योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेतला. रोहित पवार यांनी या निर्णयाचे ट्विट करत स्वागत केले आहे. जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल, अशी टीका भाजपवर रोहित पवार यांनी केली आहे.
जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल. https://t.co/AAkrL9Q6T1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 14, 2020
यापूर्वीही रोहित पवार यांनी कॅगच्या अहवालाचा हवाला देत जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची मागणी केली होती. मागील भाजप सरकारने ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला. भूजलपातळीत तब्बल ९६३३ कोटी रुपये खर्चूनही वाढ झाली नसेल, तर हे पैसे कुठे मुरले व कुणाची पातळी उंचावली याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.