चंद्रकांत पाटलांची जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याच्या निर्णयावर आगपाखड


कोल्हापूर – माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ठाकरे सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चौकशी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा निर्णय चुकीचा असून सहभाग घेणाऱ्या जनतेचीही चौकशी करणार का ? असा सवाल विचारला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय चुकीचा असून यामध्ये जनतेचाही सहभाग होता, तर मग जनतेची ही चौकशी करणार का? जलयुक्त शिवार योजनेबाबत सरकार कोणाचीही चौकशी करू शकते. पण त्यातून चांगली कामे झाली आहेत याचा विसर पडता कामा नये, असे म्हटले आहे. अनेक फायदे जलयुक्त शिवार योजनेचे झाल्याचे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले. जमिनीतील पाणी साठा वाढला असून त्याचा फायदा झाल्याचे शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. शेतकऱ्यांनी पीक दुबार तिबार घेण्याचा आनंद अनुभवला आहे. पाणीटंचाईचे बरेच प्रश्न कमी झाले असून पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.

आरेमधील कारशेड कांजूरला हलवण्याच्या निर्णयावरही यावेळी त्यांनी टीका केली. आरे येथील कारशेड बदलण्याचा निर्णय चुकीचा आहे. तो कांजूरमार्ग येथे बदलण्याचा निर्णय सरकारच्या अंगलट येईल. त्यामुळे हा प्रकल्प पाच वर्षे रखडेल, अशी भीती यावेळी त्यांनी व्यक्त केली. राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.