ठाकरे सरकारने जाहीर केली अनलॉकची नवी नियमावली


मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन आता राज्य सरकार टप्प्याटप्प्याने शिथील करत असून लॉकडानच्या पाचव्या टप्प्याला १ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार ठाकरे सरकारकडून बऱ्याच प्रमाणात काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. दरम्यान मेट्रो आणि ग्रंथालये सुरु करण्यासाठीही राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भात नवे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. पण यामध्ये शाळा, महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भातील परवानगी अद्यापही देण्यात आलेली नाही, पण शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या परिपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबरपर्यंत शाळा, महाविद्यालये तसंच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था बंद राहणार आहेत. दरम्यान शाळांना ५० टक्के शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काऊन्सलिंग याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे. शाळा शिक्षण विभागाकडून यासंबंधी नियमावली जाहीर केली जाणार आहे.

कोरोनासंबंधित नियमांचे पालन करुन सर्व सरकारी आणि खासगी ग्रंथालयांना काम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ग्रंथालये १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. याशिवाय मेट्रोलाही टप्याटप्याने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय आठवडी बाजार भरवण्यासही परवानगी देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर १५ ऑक्टोबरपासून आठवडी बाजार भरवला जाऊ शकतो, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.