संभाजीराजेंच्या गौप्यस्फोटवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया; त्यांचा गैरसमज झाला


नागपूर – विजय वडेट्टीवार यांनी संभाजीराजे यांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया देताना ओबीसीमध्ये मराठा समाजाला का समाविष्ठ करत नाही, असे मी खासगीमध्ये सुद्धा बोललो नाही. ओबीसीसाठी 27 टक्के कोटा आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही घ्या, असे मी संभाजीराजे यांना खासगीमध्ये सुद्धा बोललो होतो. पण राजेंचा गैरसमज झाला. त्यातून ते बोलले. पण ते जे बोलले ते अर्धवट बोलले, याचा खेद वाटतो असेही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. जी लढाई मी ओबीसीसाठी लढत आहेत, त्याची धार बोथट करण्याची ही खेळी असावी, अशी शंकाही वडेट्टीवार यांनी यावेळी बोलून दाखवली.

त्याचबरोबर पुढे बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, मी ओबीसी समाजात जन्मलेला आणि ओबीसीसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. मी कधीही ओबीसी समाजाचे वाईट होऊ देणार नाही. मी ओबीसी समाजासाठी लढेन, मला मंत्रिपद महत्त्वाचे नाही. समाज खितपत पडला आहे, त्याला न्याय मिळावा, ही माझी अपेक्षा आहे आणि ती लढाई मी लढणार आहे. त्यासाठी मंत्रिपद गेले तरी मी मागेपुढे पाहणार नाही.

मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ठ करू नये, अशी माझी सुरूवातीपासूनची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, पण आमचे नुकसान होऊ नये, असे माझे म्हणणे आहे. पण ओबीसींच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का? हे सुद्धा समजायला पर्याय नसल्याचे विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारकडे मराठा आरक्षणाचा विषय संभाजीराजे यांनी न्यावा, त्याचे काम लवकर होईल, असा सल्ला देखील वडेट्टीवार यांनी दिला.