15 ऑक्टोबरपासून उघडणार देशातील थिएटर, या नियमांचे करावे लागणार पालन


नवी दिल्ली: अनलॉक-5 अंतर्गत देशातील चित्रपटगृहे सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पण सरकारने कोरोनामुळे साहजिकच यासाठी काही अटी-नियम घालून दिले आहेत. मंगळवारी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबद्दलची माहिती दिली. त्यानुसार आता चित्रपटगृहांचे मालक आणि प्रेक्षकांना काही नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

पण, बॉलिवूड इंडस्ट्रीवर कोरोनामुळे ओढावलेली अवकळा पाहता पूर्वीच्या जोमानेच देशभरातील चित्रपटगृहांचा व्यवसाय चालणार का, याबाबत शंका आहे. बॉलिवूडचे अनेक चित्रपट चित्रपटगृहे बंद असल्याने प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. पण, मर्यादित प्रेक्षकसंख्येचा विचार करता संबंधित निर्माते आणि दिग्दर्शक सध्याच्या घडीला आपले चित्रपट प्रदर्शित करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्याचबरोबर मर्यादित प्रेक्षक संख्येमुळे मल्टिप्लेक्सेसकडून तिकिटांच्या दरात वाढ केली जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे आता चित्रपटगृहे सुरु झाल्यानंतर प्रेक्षक या सगळ्याला कशाप्रकारे प्रतिसाद देणार, यावरच पुढील समीकरणे अवलंबून असतील.


काय आहे केंद्र सरकारची नियमावली?

  • चित्रपटगृहाच्या एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्केच जागांवर प्रेक्षकांना मुभा.
  • सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे उर्वरित जागा रिक्त ठेवाव्या लागणार.
  • प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे एकमेकांच्या बाजूला बसता येणार नाही. प्रत्येक प्रेक्षकामध्ये एका आसनाचे अंतर राखणे अनिवार्य
  • रिकाम्या आसनांवर ‘Not to be occupied’ स्टिकर लावणे बंधनकारक.
  • चित्रपटगृहात प्रवेश केल्यानंतर प्रेक्षकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक असेल.
  • चित्रपटगृहात हात धुण्यासाठी आणि हँड सॅनिटायझर्सची व्यवस्था असणे अनिवार्य.
  • चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांना आरोग्य सेतू अॅप वापरण्याचा सल्ला द्यावा.
  • चित्रपटगृहात येण्यापूर्वी प्रेक्षकांचे थर्मल स्कॅनिंग करावे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रेक्षकांनाच आतमध्ये प्रवेश द्यावा.