भाजपच्या बड्या नेत्याचा दावा; शरद पवारांना संपवायचे आहे शिवसेनेचे अस्तित्व


अहमदनगर : राज्यातील बहुसंख्य भाजप नेत्यांकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकार पडेल, असे दावे केले जात असतानाच त्यातच आता भाजपमधील एका मोठ्या नेत्याने एक धक्कादायक वक्तव्य करुन राजकीय वातावरण तापवले आहे. राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डीले यांनी आज जोरदार टीका केली आहे. शरद पवारांना शिवसेनेचे अस्तित्व संपवायचे असल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला आहे.

याबाबत कर्डीले म्हणाले की, शरद पवार सांगत आहेत की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॅप्टन आहेत, पण त्यांना बाहेर फिरु दिले जात नाही. त्याचवेळी ते स्वतः मात्र या वयात सर्वत्र फिरत आहेत. त्यामागचा शिवसेना संपवणे हा एकमेव हेतू असल्याचे स्पष्ट दिसून येते. राष्ट्रवादीला हे करत असताना कशाप्रकारे ताकद मिळेल याचा प्रयत्नदेखील त्यांच्याकडून सुरु आहे. तसेच हे सरकार अपयशी ठरल्याचे मी बोलत नाही तर सर्वसामान्य जनता तसे म्हणते. कोरोनाला रोखण्यात हे सरकार साफ अपयशी ठरले आहे. रुग्णांसाठी अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नाहीत, ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. औषधेदेखील मिळत नाहीत. परंतु त्याच वेळी हॉस्पिटलची लाखो रुपयांची बिले मात्र द्यावी लागतात. यावरुन स्पष्ट होते की, हे सरकार अपयशी ठरले आहे.