उद्यापासून उघडणाऱ्या हॉटेल्स आणि बारसाठी अशी आहे नियमावली


देशासह राज्यावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे आर्थिक परिस्थिती विस्कळीत झाली असून, राज्यावरील आर्थिक ताण वाढत चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. राज्य सरकारने मागील दिवसांपासून मागणी होत असलेली हॉटेल्स व बार सुरू करण्यास परवानगी दिली असून त्यानुसार उद्यापासून (सोमवार) राज्यातील हॉटेल्स आणि बार सुरु होणार आहेत. पण त्यासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

अशा प्रकारे आहे नियमावली

  • दोन टेबलांमध्ये एक मीटरचे अंतर, शारीरिक अंतराचे नियम पाळण्याबरोबरच ताप-सर्दी-खोकल्यासारखी लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश, बुफे पद्धतीला बंदी, आत सोडताना प्रत्येकाची तपासणी, फक्त ५० टक्के आसनक्षमतेचा वापर करणे आदी बंधने असलेली मार्गदर्शक नियमावली उपाहारगृहे आणि बारसाठी राज्य सरकारने शनिवारी लागू केली आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांची नियमित कोरोना चाचणी करण्याची अटही मालकांवर घालण्यात आली आहे.
  • सर्व उपाहारगृहे, बारमध्ये अंतर्गत रचनेत बदल करून दोन टेबलांमध्ये किमान एक मीटरचे अंतर राहील अशी व्यवस्था करावी, दिवसातून किमान दोन वेळा संपूर्ण परिसर निर्जंतुक करावा, कर्मचाऱ्यांना एन-९५ किंवा तत्सम मुखपट्टी देण्यात यावी, सीसीटीव्हीचे चित्रण जपून ठेवण्याची अटही घालण्यात आली आहे.
  • बारमधील मद्याच्या सर्व बाटल्या व इतर साधनांची स्वच्छता चोख ठेवावी, ग्लासचे निर्जंतुकीकरण करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
  • कोरोनाची लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश द्यावा व त्यासाठी प्रत्येक ग्राहकाची थर्मल गनने तपासणी करावी.
  • शरीराचे तापमान १०० डिग्री फॅरेनहाइटपेक्षा अधिक आढळल्यास त्यांना प्रवेश देऊ नये आणि सर्व ग्राहकांचे नाव, संपर्क क्रमांक आदी तपशील नोंदवून ठेवावे.
  • तसेच हे तपशील स्थानिक प्रशासनाला देण्याबाबतची त्यांची संमती घ्यावी.
  • सुरक्षित अंतराच्या नियमांचे कसोशीने पालन करावे, ग्राहकांना सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे, रोख रकमेचे व्यवहार करताना खबरदारी घ्यावी आणि शक्यतो ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य द्यावे, स्वच्छतागृहांचे सॅनिटायझेशन ठरावीक अंतराने करावे, रोखपाल आणि ग्राहकांचा थेट संपर्क येणार नाही या दृष्टीने प्लास्टिकचा पारदर्शक पडदा लावावा, हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी, असे या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
  • सर्व कर्मचाऱ्यांना वापरून फेकता येतील असे हातमोजे व इतर साधने देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहे.
  • राहण्याची व्यवस्था असलेल्या हॉटेल-रिसॉर्टसारख्या ठिकाणी वरील सर्व नियमांबरोबरच इतरही काही नियम घालण्यात आले आहेत.
  • अतिथींची एकाच वेळी उपाहारगृहात गर्दी होऊ नये यासाठी त्यांना वेळेची आगाऊ नोंदणी करण्यास सांगावे, कक्षांचे दरवाजे उघडण्यासाठी कर्मचारी नेमावेत अशा अनेक अटी घालण्यात आल्या आहेत.
  • शक्य असल्यास प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावेत.
  • दारे-खिडक्या खुल्या ठेवून शुद्ध हवा आत येऊ द्यावी.
  • वातानुकूलन यंत्रणेचा वापर टाळावा. वातानुकूलित यंत्रणा वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे.
  • शक्यतो शिजवलेले पदार्थच असावेत. सलाडसारखे कच्चे पदार्थ, थंड पदार्थ टाळावेत.
  • प्रत्येक ग्राहकाच्या वापरानंतर त्या जागेचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
  • टेबल, खुर्च्या, काउंटर आदी जागांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
  • ताट-चमचे आदी सर्व भांडी गरम पाण्यात आणि मान्यताप्राप्त जंतुनाशकाने धुवावीत.
  • ग्राहकांना सेवा देण्याच्या वस्तू, भांडी ही वेगवेगळी आणि निर्जंतुक केलेल्या कपाटात ठेवावीत.
  • भांडी आणि अन्नपदार्थ गरम ठेवण्यासाठी वेगवेगळे वॉर्मर्स वापरावेत.
  • ग्राहकांनी वापरलेली भांडी एका बाजूला जमा न करता तातडीने धुण्यासाठी न्यावीत.