ड्रग्स प्रकरणावरुन बॉलीवूडवर होत असलेल्या आरोपांवर अक्षय कुमारने सोडले मौन


ड्रग्स प्रकरणावरुन बॉलीवूडवर होत असलेल्या आरोपांवर अभिनेता अक्षय कुमारने अखेर मौन सोडले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत अक्षयने चाहत्यांना व माध्यमांना विनंती केली आहे.

मी खूप जड अंत:करणाने आज तुमच्याशी बोलत आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमच्याशी बोलायची इच्छा होती, पण सगळीकडे एवढी नकारात्मकता पसरली आहे की काय बोलू आणि कोणाशी बोलू हे समजत नव्हते. तुमच्या प्रेमानेच बॉलिवूडला मोठे केले आहे. तुमचा रागसुद्धा आम्हाला आज मान्य आहे.


सुशांत सिंह राजपूतच्या अकस्मात मृत्यूनंतर असे अनेक मुद्दे समोर आले आहेत, ज्यांनी केवळ तुम्हालाच नाही तर आम्हाला सुद्धा धक्का दिला आहे. आपल्याला या मुद्द्यांनी आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडले आहे. फिल्म इंडस्ट्रीतील ड्रग्जचा मुद्दा समोर आला आहे. मी माझ्या हृदयावर हात ठेवून हे खोटे कसे बोलू की ड्रग्जची समस्या इंडस्ट्रीत अस्तित्त्वात नाही? इंडस्ट्रीत ड्रग्जची समस्या आहे पण इंडस्ट्रीतील प्रत्येकाचा त्यात सहभाग आहे, असे होऊ शकत नाही.

प्रशासनाकडून अगदी योग्य पद्धतीने ड्रग्जचा तपास होईल आणि इंडस्ट्रीतील प्रत्येक माणूस त्यांना चौकशीत सहकार्य करेल. पण मी हात जोडून विनंती करतो, की संपूर्ण इंडस्ट्रीला एकाच दृष्टिकोनातून पाहू नका. हे चुकीचे आहे. मी माध्यमांनाही विनंती करतो की त्यांनी संवेदनशील राहून योग्य बातमी द्यावी. कारण एका नकारात्मक बातमीने त्या व्यक्तीची वर्षानुवर्षांची मेहनत पाण्यात जाईल. चाहत्यांनाही मी विनंती करतो की त्यांचे प्रेम आणि त्यांचा विश्वास आम्ही पुन्हा जिंकून दाखवू. पण आमची साथ सोडू नका.