नवी दिल्ली – ३० ऑगस्टच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय कंपन्यांनी निर्माण केलेल्या अॅप्सचे कौतुक केले होते. यावेळी अनेक अॅप्सच्या नावांचा मोदींनी उल्लेख केला होता. मोदींनी केलेल्या या कौतुकामुळेच अवघ्या दोन दिवसांमध्ये हे अॅप्सचा गुगल प्ले स्टोअरवर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेल्या अॅप्सच्या यादीत समावेश झाला आहे. गुगल प्ले स्टोअरवरील सोशल या कॅटेगरीमध्ये टॉप दहा अॅपमध्ये जोश, स्नॅपचॅट, मोज, रोपोसो आणि चिंधिगिरी या अॅप्सचा समावेश आहे. तर एपी सरकार सेवा, दृष्टी, सरळडेटा, व्हूट किड्स, पंजाबएज्यूकेअर, डाउटनट, कुटूकी कीट्स या अॅप्सची शिक्षण या कॅटेगरीमधील लोकप्रिय अॅप्सच्या यादीमध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे आरोग्य सेतू अॅपबरोबरच भारतीय बनवटीची स्टेपसेटगो, होम वर्कआऊट, लूज वेट अॅप फॉर मेन, इन्क्रीज हाइट वर्कआऊट, सिक्स पॅक्स इन ३० डेज ही अॅप्स आरोग्यविषयक अॅप्सच्या यादीमध्ये असल्याचे दिसून येत आहे.
मोदींनी उल्लेख केलेली भारतीय अॅप्स गुगल प्ले स्टोअरच्या Top 10 मध्ये दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांनी भारतीय बनावटीच्या अॅप्सला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ३० ऑगस्टच्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये केले होते. केवळ आत्मनिर्भर भारत मोहिमेला या माध्यमातून बळ मिळणार आहे. या अॅप्सला प्रोत्साहन दिल्यास ही अॅप्स सध्या लोकप्रिय असणाऱ्या मात्र परदेशी कंपन्यांच्या मालकीची असल्याने वापरासाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अॅप्सला टक्कर देऊ शकतील का याचीही चाचपणी करता येईल, असे मोदी म्हणाले होते. मोदींनी यावेळी भारतीय अॅप निर्मिती करणाऱ्या कूकू, स्टेपसेट गो, झोहो, चिंधिगिरी, कुटूकी, एफटीसी टॅलेंट यासारख्या कंपन्यांचे कौतुक केले होते.
देशभरातून आत्मनिर्भर अॅप इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेमध्ये आलेल्या सात हजार अर्जांपैकी सर्वोत्तम अॅप्स निवडण्यात आली आहे. वेगवेगळ्या कॅटेगरीमधील ही सर्व अॅप्स आहेत. यामध्ये प्रमुख्याने गेमिंग, मनोरंजन, व्यापार, वापर (युटीलिटी), सोशल मिडिया आणि आरोग्यसंदर्भातील अॅप्स या कॅटेगरींचा समावेश आहे. देशातील तरुणाईला महिन्याच्या सुरुवातीला अॅप इनोव्हेश चॅलेंज देण्यात आले होते. या आत्मनिर्भर अॅप इनोव्हेशन चॅलेंजमध्ये आपल्या देशातील तरुणाईने मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये जवळजवळ सात हजार अॅप्सच्या माध्यमातून निर्मात्यांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे त्यापैकी दोन-तृतीयांश अॅप्स हे देशातील टू आणि थ्री टायर शहरांमधील तरुणांनी बनवल्याचे सांगत मोदींनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व अॅप निर्मात्यांचे अभिनंदन केले.
भारतामध्ये पुढील गुगल, फेसबुक आणि ट्विटर निर्माण होईल. या सर्व लोकप्रिय साईट्सला भारतीय पर्याय उपलब्ध करुन देण्याचा आमचा हेतू असल्याचे मत या स्पर्धेशी संबंधित अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. जागतिक पातळीवर भारतीय तरुणांनी तयार केलेल्या अॅप्सला मान्यता मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.