महाविकास आघाडी सरकारवर देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप


नागपूर – माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी नागपुरात आले असता पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील हे सरकार दबावाखाली काम करत आहे का? अशी शंका असून त्यांचा बदल्या करणे हा एकमेव धंदा असल्याचा आरोप केला आहे. रुग्णालयांमधील उपचार खर्चावरील दरांवर नियंत्रण आणण्यासंबंधी विचारले असता दबावाखाली सरकार काम करत आहे का?, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

फक्त बदल्यांच्या मागे संपूर्ण शासन लागले आहे. शासनात सध्या बदल्या करणे हा एकमेव धंदा चालला आहे. बदल्या महत्त्वाच्या आहेत, पण एखाद्या वर्षी नाही केल्या म्हणून काही फरक पडत नाही. ५०० कोटींच्या घरात बदल्यांचा एका वर्षाचा खर्च जातो. कोरोना संकटात या बदल्या केल्या नसत्या तरी चालले असते. पण मंत्री, प्रशासन सगळेजण कोणाला कशी पोस्टिंग मिळणार, कुठे बदली होणार यात गुंग असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

बदल्या दरवर्षी होत असतात पण आमच्या काळात कोरोना नव्हता. आमच्या काळात जर कोरोना असता आणि बदल्या झाल्या असत्या तर बोट दाखवता आले असते. बदल्यांचा भत्ता देण्यासाठी ५०० कोटी लागतात. येथे पगार देण्यासाठी पैसे नाही आणि मग बदल्या कशाला सुरु आहेत?, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आता कोरोनाचा प्रादुर्भाव नागपुरात वाढताना दिसत आहेत. आता हळूहळू मृत्यूदेखील वाढत असून परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे नागपुरला आयसोलेशन धोरण आखण्याची गरज आहे. जास्तीत जास्त चाचण्या करुन आयसोलेशन करण्याची गरज आहे. यामुळे मृत्यूसंख्येवर नियंत्रण आणता येईल. मी गेल्या दौऱ्यात अधिकाऱ्यांशी यासंबंधी चर्चा केली होती. आता हे धोरण आक्रमकपणे राबवण्याची गरज असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. फडणवीस यांनी पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूवर बोलताना सांगितले की, गंभीर परिस्थिती असून मीदेखील त्याची माहिती घेतली. अशा पद्दतीने तरुण पत्रकाराचा मृत्यू होणे, अंतर्मुख करणारे आहे. याकडे तात्काळ लक्ष दिले पाहिजे.