30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार विठ्ठल रुक्मिणी मंदिर


पंढरपूर : राज्य सरकारने प्रकाश आंबेडकर यांनी काल केलेल्या राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीची दखल घेतल होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मंदिरे लवकरच उघडण्यात येतील असे आश्वासन दिले होते. पण आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतला आहे.

पंढरपुरात काल राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन केले होते. पाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोमवारी या आंदोलनापुरते उघडण्यात आले होते. यानंतर आंबेडकर यांच्यासह १५ जणांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. राज्य सरकारने आपल्यासह १५ जणांना मंदिरात जाण्याची, विठ्ठलाचे दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली होती.

दरम्यान सरकारने राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी १० दिवसांची मुदत मागितली आहे. सरकारकडून या १० दिवसांत नियमावली जारी करण्यात येईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिल्याचे आंबेडकर यांनी सांगितले होते. १० दिवसांत नियमावली तयार झाली नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपुरात आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा आंबेडकर यांनी दिला होता. पण आज मंदिर समितीनेच 30 सप्टेंबरपर्यंत मंदिर न उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. याची माहिती मंदिर समितीने प्रसिद्धीपत्रक काढून दिली. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर 17/3/2020 ते 31/8/2020 पर्यंत बंदच ठेवण्यात आले होते. राज्य सरकारनेही जारी केलेल्या लॉकडाऊनच्या नोटिसीमध्ये राज्यातील मंदिरे 31 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. यानुसार 30 सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंदच राहणार असल्याचे मंदिर समितीने म्हटले आहे. या दरम्यानचे सणवार, उत्सव परंपरेनुसार साधेपणाने साजरे केले जाणार असल्याचे म्हटले आहे.